खराब रस्त्याने घेतला आणखी बळी

By Admin | Updated: July 18, 2014 01:44 IST2014-07-18T00:55:09+5:302014-07-18T01:44:58+5:30

पालम : तालुक्यातील रेवा तांडा गावाला जोडणारा रस्ता पाऊस पडताच वाहतुकीच्या लायकीचा राहत नाही.

Another victim took a bad road | खराब रस्त्याने घेतला आणखी बळी

खराब रस्त्याने घेतला आणखी बळी

पालम : तालुक्यातील रेवा तांडा गावाला जोडणारा रस्ता पाऊस पडताच वाहतुकीच्या लायकीचा राहत नाही. या खराब रस्त्यामुळे साप चावलेल्या रुग्णाला वेळेवर दवाखान्यात नेता न आल्याने प्राण गमवावा लागला आहे. ही घटना १४ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
पालम तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. रेवा तांडा या गावाला जाण्यासाठी राणीसावरगावहून चार कि. मी. चा तर चाटोरी गावाहून ३ कि. मी. चा रस्ता आहे. परंतु हे दोन्ही रस्ते अतिशय खराब झाले आहेत. सदरील रस्त्यावर जागोजाग मोठमोठे खड्डे पडून रस्त्यावरील गिट्टी उघडी पडली आहे. पाऊस पडताच चिखल तयार होऊन खड्यात पाणी साचते. यामुळे या रस्त्याने प्रवास करणे जीवघेणी ठरत आहे. बैलगाडी वगळता वाहतुकीसाठी इतर पर्यायाचा वापर होणे मुश्कील झाले आहे.
१४ जुलै रोजी घरात जेवण करीत असताना चापला थायरू चव्हाण (वय ६०) या थैरूनाईक तांडा येथील रहिवाशाला सापाने उजव्या हाताच्या बोटाला चावा घेतला. या रुग्णाला रेवा नाईक तांडा ते राणीसावरगाव रस्त्याने बैलगाडीत टाकून उपचारासाठी घेऊन जाण्यात येत होते. बैलगाडीचा वेग कमी असल्याने रस्ता काटणे मुश्कील होते.
रस्त्याने जात असतानाच या रुग्णाने प्राण सोडला. खराब रस्त्याने या रुग्णाचा जीव घेतला आहे. या रस्त्याचे आता तरी मजबुतीकरण करण्यात यावे, अशी मागणी गोविंद चव्हाण, भगवान राठोड, संतोष राठोड, बंडू चव्हाण, बंडू चव्हाण, अंकूश राठोड, सोपान चव्हाण, बालाजी कवडे, निवृत्ती राठोड आदींनी केली आहे. (प्रतिनिधी)
वर्षापूर्वी गेला होता महिलेचा बळी
रेवा तांड्याच्या रस्त्याचा प्रश्न हा दोन जणांना जीव गमवावा लागला तरी मार्गी लागलेला नाही. मागील वर्षभरापूर्वी आॅगस्ट महिन्यात महिलेला प्रसुतीसाठी घेऊन जात असताना रस्त्यात वाहन फसल्याने महिलेचा जीव गेला होता. वर्षभरानंतर साप चावलेल्या रुग्णाचा उपचाराअभावी जीव गेलेला आहे. या गावातील ग्रामस्थांनी विद्यमान लोकप्रतिनिधींना भेटून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. रस्त्याचा प्रश्न सोडविणे दूरच उलट सदरील लोकप्रतिनिधीने ग्रामस्थांची टिंगल केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती दिली आहे.
आंदोलनाचा इशारा
राणीसावरगाव ते रेवा तांडा या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी ग्रामस्थांनी वारंवार मागणी केलेली आहे. परंतु या मागणीला प्रशासन व लोकप्रतिनिधीनी केराची टोपली दाखविलेली आहे. ग्रामस्थांनी हा रस्ता जीवघेणा ठरत आहे. या रस्त्याचे काम करावे अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Another victim took a bad road