नाचनवेल : औरंगाबाद-पाचोरा मार्गावरील चौफुली ते नाचनवेल या दीड किमी लांबींच्या रस्त्याची अवस्था ही पाणंद रस्त्यापेक्षाही भयंकर झाली आहे. या ठिकाणाहून वाहनधारकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. वेळोवेळी पाठपुरावा, आंदोलने करूनही बांधकाम विभागाचे अधिकारी सुस्त झाले आहेत. तर निवडणूकीच्या काळात रस्ता बनवून देऊ असे आश्वासन देणारे नेते ही विसरून नामानिर्माळे झाली आहेत. मात्र, नाचनवेल करांच्या नशीबी मात्र यातना कायमच आहेत.
माती व मुरूम वापरून दाबण्यात आलेली खडी उखडल्याने पादचारी व वाहनधारकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. औरंगाबाद जिल्ह्याला खान्देशशी जोडणारा हा सर्वात जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर दिवसरात्र रहदारी असते. वाहनांनी उडविलेल्या खडी व धुळीने नागरिकांना दररोज किरकोळ अपघात व श्वसनासंबंधीचा त्रास सहन करावा लागतो आहे. संबंधित कंत्राटदार, अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी टोलवाटोलवी न करता आपसांत समन्वय साधून या रस्त्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
नागरिक म्हणतात....
पेट्रोल भरण्यासाठी पंपावर जात असताना ट्रकच्या टायरमुळे उडालेला दगड सरळ छातीत लागून जखमी झालो. हा दीड किमीचा रस्ता अंत्यत धोकादायक बनला आहे. या मार्गावरून पायी चालतानाही भिती वाटते. - दशरथ एकनाथ थोरात, गावकरी, नाचनवेल
महाविद्यालयीन विद्यार्थी पिशोरला कॉलेजमध्ये जाण्यासाठी बसस्थानकावर थांबल्यास अनेक बसेस खराब रस्त्यामुळे चौफुलीवरून परस्पर निघून जातात. त्यामुळे दीड किमी पायपीट करत वाहन पकडावे लागते. पायी चालताना अंग धुळीने माखून जाते, तसेच वाहनाखाली वेगाने उडणारे दगड चुकवत चालावे लागते. - तुषार सदाशिव शिंदे, गावकरी
------
फोटो -