चंद्रपुरातील झी बाजाराला भीषण आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 05:00 AM2020-01-21T05:00:00+5:302020-01-21T05:00:15+5:30
रविवारी दिवसभर झी बाजार सुरू होता. त्यानंतर रात्री येथील सर्व कर्मचारी निघून झी बाजार बंद करण्यात आला. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास झी बाजाराला अचानक आग लागली. झी बाजारात कपडे, प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ उठत होते. दरम्यान, याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील जयंत टाकीज चौकात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या झी बाजाराला रविवारी पहाटे १.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कपडे, प्लास्टिकचे साहित्य, खेळण्याचे साहित्य आदी वस्तू पूर्णत: जळून खाक झाल्याने ३ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी जयंत टॉकीज चौकात मागील अनेक वर्षांपासून झी बाजार नियमित सुरू आहे. रविवारी दिवसभर झी बाजार सुरू होता. त्यानंतर रात्री येथील सर्व कर्मचारी निघून झी बाजार बंद करण्यात आला. दरम्यान, रात्री १.३० वाजताच्या सुमारास झी बाजाराला अचानक आग लागली. झी बाजारात कपडे, प्लास्टिकचे साहित्य असल्याने आगीने क्षणार्धात रौद्र रुप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ उठत होते. दरम्यान, याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली.
त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जवळपास १७ अग्निशमन दलाच्या गाडया घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या ज्वाला निघत असल्याने दुरुन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला जात होता. मात्र यात यश येत नव्हते. त्यानंतर जेसीबी आणून त्याच्या सहाय्याने इमारतीचे छत तोडून आग विझविण्याचा प्रयत्न करण्यात आला. सकाळी ७ वाजताच्या सुमारास आगीच्या ज्वाळा शांत झाल्या. मात्र आतून आग धुमसतच होती. त्यामुळे अग्निशमन पथकाकडून सोमवारी दिवसभर आग विझविणे सुरूच होते.
या आगीत कोट्यवधीचे साहित्य होते. ते सर्व जळून खाक झाले. शहर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. आग कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र शार्टसर्कीटमुळे आग लागली असावी, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सदर झी बाजार हे मागील महिन्यात बंद होते आता पुन्हा नुकतेच सुरू झाले होते.
उनी वस्त्रांची दुकाने हलविली
याच झी बाजाराला लागून तिबेटीयन लोकांचे उनी कपडयांची दुकाने लागली होती. मात्र ही आग वेळीच लक्षात आल्याने उनी कपडयांचे गाठोडे बांधून ते रस्त्यावर जमा करून ठेवल्याने पुढील अनर्थ टळला.
सकाळी उसळली गर्दी
सदर आग रात्रीच्या सुमारास लागली. त्यामुळे याची माहिती अनेकांना झाली नाही. मात्र पहाटे नागरिक आझाद बागेत फिरायला येऊ लागल्यानंतर झी बाजाराला आग लागल्याची वार्ता सर्वत्र पसरली. त्यानंतर बघ्याची एकच गर्दी उसळली. चंद्रपूर शहर पोलिसांनी दंगा नियंत्रण पथकासह घटनास्थळी दाखल होऊन गर्दीवर नियंत्रण मिळविले.
जीवितहानी टळली
या झी बाजारात सुमारे ३०-४० कर्मचारी काम करतात. यात महिलांचाही समावेश आहे. दिवसभर सर्व कर्मचारी या गजबजलेल्या झी बाजारातच असतात. सदर आग दिवसाच्या सुमारास लागली असती तर एकच तारांबळ उडून मोठा अनर्थ ओढवला असता. मात्र आग सर्व कर्मचारी निघून गेल्यावर रात्रीच्या सुमारास लागली. त्यामुळ जिवितहानी झाली नाही.