हजारो शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले

By Admin | Updated: February 4, 2016 00:54 IST2016-02-04T00:54:59+5:302016-02-04T00:54:59+5:30

निसर्गाने पाहिजे त्या प्रमाणात साथ न दिल्याने जिल्ह्यातील पीकांची दैनावस्था झाली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

Thousands of farmers fell on the district collector | हजारो शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले

हजारो शेतकरी जिल्हा कचेरीवर धडकले

राष्ट्रवादीचे नेतृत्व : दुष्काळी परिस्थितीत जगावे कसे?
चंद्रपूर: निसर्गाने पाहिजे त्या प्रमाणात साथ न दिल्याने जिल्ह्यातील पीकांची दैनावस्था झाली असून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा कसा. असा प्रश्न करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाद्वारे धडक दिली.
जिल्ह्यातील हजारो शेतकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्व आघाड्याचे कार्यकर्ते सहभागी असलेला लक्षवेधी मोर्चा दुपारी २ वाजता स्थानिक बाबुपेठ मार्गावरील शिवाजी चौकामधून निघाला. ‘फडणवीस सरकार हाय हाय’ म्हणत चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकऱ्यांना पेन्शन लागू करावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अतिक्रमणधारकांना शेतजमीनीचे पट्टे देण्यात यावे, अशा घोषणा देत मोर्चेकरी गांधी चौक, जटपुरा गेटमागर््ो जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. यावेळी झालेल्या जाहीर सभेत विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, माजी आमदार सुदर्शन निमकर, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, अरुण निमजे, महिला जिल्हाध्यक्ष बेबी उईके आदींनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्याय देण्यास अकार्यक्षम ठरलेल्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन तीव्र करण्याचे आवाहन केले. जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांनी शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी सहभागी होवून संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी लक्षवेध मोर्चात सहभागी झाल्याबद्दल आभार व्यक्त केले. फडणवीस सरकार जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर अन्याय करीत असल्याचे सांगून सरकारचा निषेध नोंदवून शेतकऱ्यांच्या न्यायासाठी भविष्यात प्राणांतिक उपोषणाचा मार्ग स्विकारु असे जाहीर केले. सभेचे संचालन शहर अध्यक्ष शशीकांत देशकर यांनी केले.
यावेळी मोर्चेकरी शेतकरी व कार्यकर्त्यांच्या वतीने एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेवून चौदा मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनीही निवेदनातील ज्या मागण्या जिल्हास्तरावर सोडविता येणाऱ्या आहेत, त्या प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन दिले.
शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार, अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे, अ‍ॅड. बाबासाहेब वासाडे, सुदर्शन निमकर, शशीकांत देशकर, दीपक जयस्वाल, हिराचंद बोरकुटे, महादेव पिदुरकर, अरुण निमजे, अ‍ॅड. गोविंद भेंडारकर, बेबी उईके, सुरेश रामगुंडे, प्रशांत गाडेवार, प्रविण उरकुडे, जयस्वाल आदींचा समावेश होता. मोर्चा यशस्वीतेसाठी नितीन भटारकर, सुमित समर्थ, हरिदास झाडे, विलास नेरकर, दामोधर नन्नावार, अविनाश राऊत, मंगेश पोटवार, सचिन राऊत आदींनी परिश्रम घेतले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Thousands of farmers fell on the district collector