उन्हाळी भुईमुगातून दहा लाखांचे उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 05:00 AM2020-07-01T05:00:00+5:302020-07-01T05:01:02+5:30
परिसरातील शेतकरी नगदी पिकाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र ज्या पिकातून तेल मिळते ते पिके मागील अनेक वर्षापासून तालुक्यातून हद्दपार झाले होते. शेतकऱ्यांना स्वत:साठी तेल व जनावरांकरिता ठेप मिळावी यातून आर्थिक नफा व्हावा यासाठी वरोरा कृषी कार्यालयाने तालुक्यातील शेगाव येथील २५ शेतकऱ्यांची भुईमुग लागवडीकरिता निवड केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : भारत कृषी प्रधान देश असल्याने देशात धान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. परंतु तेलाकरिता दुसऱ्या देशावर अवलंबून रहावे लागते. तेलबियांचे उत्पादन व्हावे यासाठी वरोरा तालुक्यात प्रथमच कृषी कार्यालयांतर्गत शेतकऱ्यांना मोफत बियाने देवून उन्हाळी भुईमुग लावण्याचा प्रयोग करण्यात आला. यामध्ये तालुक्यातील शेतकऱ्यांना दहा लाखांचे उत्पादन झाले आहे.
परिसरातील शेतकरी नगदी पिकाला अधिक प्राधान्य देतात. त्यामुळे सोयाबीन, कापूस या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र ज्या पिकातून तेल मिळते ते पिके मागील अनेक वर्षापासून तालुक्यातून हद्दपार झाले होते. शेतकऱ्यांना स्वत:साठी तेल व जनावरांकरिता ठेप मिळावी यातून आर्थिक नफा व्हावा यासाठी वरोरा कृषी कार्यालयाने तालुक्यातील शेगाव येथील २५ शेतकऱ्यांची भुईमुग लागवडीकरिता निवड केली. यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण तसेच कृषी संशोधन केंद्र सिंदेवाहीच्या वतीने भुईमुंगाचे मोफत बियाणे पुरविण्यात आले.
शेगाव मंडळकृषी अधिकारी विजय काळे यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांनी उन्हाळ्यामध्ये भुईमुंगाची लागवड केली. भुईमुग लागवडीमुळे एकाच शेतात, एकाच वर्षात तीन पिके घेण्याची किमया शेतकऱ्यांना साधता आली. वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना दोनशे क्विंटल उन्हाळी भुईमुगाचे पीक झाले. यातून दहा लाख रुपयांची कमाई झाली. यामुळे पुढील वर्षी उन्हाळी भुईमुग क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
स्थानिक बाजारपेठेत भुईमुगाची विक्री
वरोरा तसेच माढेळी येथील बाजारपेठेत उन्हाळी भुईमुंग पाच हजार रुपये प्रती क्विंटल प्रमाणे विकण्यात आले. बाजारपेठ उपलब्ध झाल्याने भुईमुंग उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर काही शेतकऱ्यांना बाजारात किरकोळ विक्री केल्याने त्यांनाही आर्थिक लाभही झाला.
सोयाबिन पिकानंतर हरभऱ्याचे पीक घेतले जाते. त्यानंतर जानेवारी महिन्याच्या शेवट उन्हाळी भुईमुग लावल्यास उत्पादन चांगले होते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळेल. मे महिन्यात उन्हाळी भुईमुग निघून शेताची मशागत करुन हंगामात दुसऱ्या पिकाची पेरणी करता येईल.
- व्ही. आर. प्रकाश,
तालुका कृषी अधिकारी, वरोरा