लोकमत न्यूज नेटवर्कगोंडपिपरी : तालुक्यातील करंजी येथील एक २२ वर्षीय तरुण रोजगारासाठी तेलंगणातील हैदराबाद येथे गेला होता. लॉकडावून काळात गेल्या चार दिवसांपूर्वी परतल्यानंतर शासनाचे वतीने नोंद करून घेत त्याला गृह विलगीकरणात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी उशिरा रात्री स्थानिक प्रशासनाला त्या युवकाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून त्या युवकास ताबडतोब चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर करंजी गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. शेतीच्या ऐन हंगामात गाव कंटेनमेंट झोन झाल्याने गावकरी संतापले आहेत. सदर युवकाला आधीच संस्थात्मक अलगीकरणात का ठेवले नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तालुक्यातील करंजी गावातील बहुतांश मजूर हे रोजगाराच्या शोधात बाहेर राज्यात गेले होते. त्यापैकीच एक असलेल्या २२ वर्षीय तरुण रोजगारासाठी हैदराबाद येथे गेला होता. पाच दिवसांपूर्वी तो युवक आपल्या मूळ गावी परतला. प्रशासनाने त्याला गृह विलगीकरणात ठेवले.याच दरम्यान त्या युवकास कोरोनाचे लक्षण जाणवत असल्याने त्या युवकाचा स्वब नमुना तपासणीसाठी पाठविला. शुक्रवारी रात्री उशिरा त्या युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर प्रशासनाने संपूर्ण करंजी गाव कंटेनमेंट झोन घोषित केले आहे. सदर युवक गावात फिरल्याची माहिती आहे.परराज्यातून रेडझोनमधून परतलेल्या मजुराला गृह विलगीकरणात ठेवण्यापेक्षा संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेतला असता तर आज करंजी गावाला कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले नसते. सध्या शेती हंगाम सुरू असून करंजी गावात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने अनेक मजुरांचा रोजगार हिरावला असून या परिस्थितीस पूर्णता ग्रामपंचायत प्रशासन जबाबदार आहे.-तुकेश पत्रुजी वानोडे,माजी तंमुस अध्यक्ष तथा ग्रा. प. सदस्य, करंजी
कंटेन्मेंट झोन झाल्याने ऐन हंगामात करंजीवासी संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 5:00 AM
शुक्रवारी उशिरा रात्री स्थानिक प्रशासनाला त्या युवकाचा वैद्यकीय अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला असून त्या युवकास ताबडतोब चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रात हलविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर करंजी गाव कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहे. शेतीच्या ऐन हंगामात गाव कंटेनमेंट झोन झाल्याने गावकरी संतापले आहेत.
ठळक मुद्देयुवकाला संस्थात्मक अलगीकरणात का ठेवले नाही ? : गावकऱ्यांचा संतप्त प्रश्न