जिल्हा प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान व्हावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 05:00 AM2020-02-18T05:00:00+5:302020-02-18T05:00:54+5:30
तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी या रचनेमध्ये अधिक कामांचा राबता व खोळंबादेखील असतो. त्यामुळेच तालुकास्तरीय यंत्रणा आणखी बळकट करावी. आपल्याकडे येणाºया प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे समाधान करताना प्रेमाचे चार शब्द बोलले जावे, अशा सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर/नवरगाव : प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्याची नितांत गरज आहे. शेतकऱ्यांच्या, सामान्य नागरिकांच्या समस्यांना दहा दिवसात उत्तर मिळावे, अशी यंत्रणा उभारणेही तेवढेच गरजेचे आहे. जिल्हास्तरीय यंत्रणेपेक्षा तालुकास्तरीय यंत्रणेकडे ९५ टक्के कामे प्रलंबित असते. तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी या रचनेमध्ये अधिक कामांचा राबता व खोळंबादेखील असतो. त्यामुळेच तालुकास्तरीय यंत्रणा आणखी बळकट करावी. आपल्याकडे येणाºया प्रत्येक नागरिकांच्या समस्यांचे समाधान करताना प्रेमाचे चार शब्द बोलले जावे, अशा सूचना राज्याचे मदत व पुनर्वसन तसेच बहुजन कल्याण विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला केली.
नवरगाव येथील लोकसेवा हायस्कूलच्या प्रांगणामध्ये ‘पालकमंत्री आपल्या दारी’ या अभिनव योजनेचा शुभारंभ ना. वडेट्टीवार यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. ना. विजय वडेट्टीवार यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम जिल्ह्यामध्ये आजपासून सुरू झाला. दिवसभरात तब्बल ५०० नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यात प्रशासनाला यश आले. चंद्रपूर जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांमध्ये हा कार्यक्रम माहिन्यातून दोन वेळा होणार आहे. लिखित दिलेल्या तक्रारींचे टोकन क्रमांक बनवून पालकमंत्र्यांनी व्यासपीठावरच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविले. या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिकारी प्रशांत खैरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपवनसंरक्षक कुलराजसिंग, ताडोबाचे उपसंचालक गुरुप्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उदय पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड, विभागीय वन अधिकारी अशोक सोनकुसरे, जिल्हा परिषद सदस्य रमाकांत लोढे, अॅड. राम मेश्राम, दिनेश पाटील चिटनूरवार, सिंदेवाहीच्या नगराध्यक्ष आशा गंडाटे, नवरगावच्या सरपंच अनिता गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते. आपल्या खात्याचे नाव आता बहुजन कल्याण विभाग करण्यात आले आहे. त्यामुळे बहुजन समुदायातील मुलांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी पुढील वर्षभरात पाचशे तरुणांना एक लाख रुपये कर्ज छोट्या-मोठ्या उद्योग व्यवसायासाठी देण्याचा प्रयत्न असेल, असेही ना. वडेट्टीवार म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन रवींद्र बिरेवार यांनी केले.
ओबीसींचे आरक्षण पूर्ववत करणार
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांमध्ये ओबीसींचे आरक्षण कमी करण्यात आले आहे. या मुद्यालादेखील ना. विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात हात घातला. आदिवासींच्या आरक्षणासाठी ओबीसींचे आरक्षण चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यामध्ये कमी करण्यात आले आहे. ते पूर्ववत १९ टक्के करण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सातबाऱ्याचे वाटप
या कार्यक्रमात तहसील यंत्रणेने पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना त्यांचा संगणीकृत सातबारा देऊन सातबारा वाटप कार्यक्रमाला सुरुवात केली. याठिकाणी वनजमिनीचे पट्टे, शेतकºयांना ट्रॅक्टरचे वाटप, विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप, तसेच विविध विभागाच्या वस्तूंचे संदर्भातील अनेक योजनांचे वाटप यावेळी करण्यात आले. सातवारा सहज उपलब्ध व्हावा, यासाठी प्रत्येक तालुक्यातील तीन स्वयंचलित मशीन लावणार असल्याची माहिती ना. वडेट्टीवार यांनी यावेळी दिली.
योजनेसाठी संपूर्ण यंत्रणा काम करेल - जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना तसेच किसान क्रेडीट कार्ड योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सांस्कृतिक नगरी असणाºया नवरगाव येथून ही योजना सुरू होत असल्याचा आनंद व्यक्त केला. पालकमंत्री आपल्या दारी या योजनेला यशस्वी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा काम करेल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.