चक घोसरीवासीयांची पाण्यासाठी भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:46+5:30
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र नळ योजना मंजूर केली. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ जानेवारी २०१९ रोजी या कामाचे ई- भूमीपूजन पार पडले होते. मात्र वर्षभराचा कालावधी होऊन कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. चकघोसरी येथे रमाई घरकूल योजनेतंर्गत ६८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भेजगाव : मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित गट ग्रामपंचायत अंतर्गत चक घोसरी येथे दहा वर्षांपूर्वी पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले. मात्र गावकऱ्यांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने भटकंती करावी लागत आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने स्वतंत्र नळ योजना मंजूर केली. विशेष म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ५ जानेवारी २०१९ रोजी या कामाचे ई- भूमीपूजन पार पडले होते. मात्र वर्षभराचा कालावधी होऊन कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे नागरिकांचा हिरमोड झाला आहे. चकघोसरी येथे रमाई घरकूल योजनेतंर्गत ६८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. घरकुलाची कामे सुरू आहेत. या कामाकरिता पाण्याचा तुटवडा भासत आहे. या गावात चार विहिरी व हातपंप आहेत. मात्र काही विहिरींतील पाणी पिण्यायोग्य नाही. सध्या पाण्याची पातळी खालावली. काही हातपंप नादुरुस्त असल्याने महिलांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. हातपंपावर घाण पसरली आहे. चकघोसरी गावात अद्याप नळ योजना पूर्णत्वास आली नाही. १० वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणतर्फे बोरचांदली व १९ गावांच्या योजनेत समावेश करून २० हजार लिटर क्षमतेची टाकी उभारली. ग्रामस्थांनी नळजोडणीही केली. मात्र पाणीपुरवठा सुरू करण्यात प्रशासनाला अजुनही यश आले नाही. गावातील जलस्त्रोत आटल्याने गावाबाहेरून पाणी आणावे लागत आहे. सध्या तापमानात वाढ होत असल्याने पाण्याची पातळी खालावणार आहे. त्यामुळे जि. प. ही समस्या सोडविण्यासाठी तातडीने पाऊल उचलावे, अशी मागणी गावकऱ्यांनी निवेदनातून केली आहे.
जिल्हा परिषदेच्या नळ योजनेसंदर्भातील माहिती पाणी पुरवठा विभागाकडून घेण्यात येईल. त्यानंतर जलव्यवस्थापन व स्थायी समितीची बैठक आयोजित करून ही समस्या तात्काळ काढण्यात येईल.
- संध्या गुरनुले, जि.प. अध्यक्ष चंद्रपूर