स्मशानभूमीच्या वादावरून आज चंद्रपूर बंदची हाक

By Admin | Updated: February 4, 2016 00:58 IST2016-02-04T00:58:43+5:302016-02-04T00:58:43+5:30

दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तिरावरील बंद स्मशानभूमीत पे्रत जाळण्याच्या प्रकरणावरून शहरातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

Chandrapur closing call on graveyard dispute today | स्मशानभूमीच्या वादावरून आज चंद्रपूर बंदची हाक

स्मशानभूमीच्या वादावरून आज चंद्रपूर बंदची हाक

पुगलियांचे प्रशासनावर ताशेरे : देवतळे गटाचा आंदोलनातून काढता पाय
चंद्रपूर : दाताळा ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इरई नदीच्या तिरावरील बंद स्मशानभूमीत पे्रत जाळण्याच्या प्रकरणावरून शहरातील वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या गटाने ४ फेब्रुवारीला चंद्रपूर बंदची हाक दिली आहे. तर, दुसरीकडे सिंधी समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रेत जाळण्याच्या घटनेशी समाजाचा संबंध नाही, असे सांगत वाद टाळण्याची भूमिका घेतली आहे. ही बंदची तयारी सुरू असतानाच जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस देवून या बंदशी जिल्हा काँगे्रस कमेटीचा संबंध नाही, असे सांगत राजकीय वाद ओढावून घेतला आहे.
बालाजी मंदीर उभारण्यात आलेल्या या इरई नदीच्या किनाऱ्यावरील स्मशानभूमीत काल मंगळवारी स्मशानभूमीचे कुलूप तोडून पोलीस बंदोबस्तात प्रेत जाळण्यात आले होते. हा प्रकार दंडूकेशाहीचा प्रत्यय देणारा असून धार्मिक भावना दुखाविणारा असल्याचे सांगत ४ फेब्रुवारीला काँग्रेसच्या गटाने बंदचे आवाहन केले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

बंदशी संबंध नाही - प्रकाश देवतळे
या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी एक पत्रक प्रसिद्धीस काढून गुरूवारच्या बंदशी जिल्हा काँग्रेस कमेटीचा संबंध नसल्याचे म्हटले आहे. या बंदसंदर्भात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी कोणतीही चर्चा झाली नाही. नागरिकांच्या कोणत्याही भावना दुखविण्याचा हेतू पक्षाचा नाही, असेही देवतळे यांनी म्हटले आहे.
झाले ते चुकीचेच - मेघराज बबनानी
सिंधी पंचायत समितीचे सचिव मेघराज बबनानी यांनी प्रसार माध्यामांना दिलेल्या मुलाखतीमध्ये दाताळा स्मशानभूमीत प्रेत जाळण्याच्या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले. ते म्हणाले, समाजाच्या पंचायतीच्या विनापरवानगीने हे घडले आहे. त्याचा समाजाशी संबंध नाही. गावकऱ्यांनी बंदी घातल्यापासून आम्ही सर्व समाजबांधव मोक्षधामवरच अंत्यसंस्कार करतो. दाताळा स्मशानभूमीला कुलूप होते, बंदचा फलकही लावला होता, तरीही तेथे प्रेत कसे जाळण्यात आले, याबद्दल आपणास माहीत नाही. आम्हाला वादविवाद, तंटा नको आहे, समाजाची अशा कृत्याला परवानगी नाही.

Web Title: Chandrapur closing call on graveyard dispute today