सिंदखेडराजा (जि. बुलडाणा): वंशाला दिवाच हवा या मानसिकतेतून आपण अजून दूर गेलो नसताना तसेच वंशाच्या दिव्याची कसर मुलीही भरुन काढत असताना अपत्यच नसलेल्या दाम्पत्याने काय करावे, याचा धडा सिंदखेडराजा तालुक्यातील आडगाव येथील वच्छलाबाई हिवाळे या ६० वर्षीय ग्रामीण महिलेने दिला. ७२ वर्षीय पतीच्या निधनानंतर त्यांच्या चितेला भडाग्नी कोण देणार? हा पश्न उपस्थित झाला तेव्हा कसलाही विचार न करता त्यांनी स्वत: आपल्या पतीच्या चितेला भडाग्नी देऊन नवा आदर्श निर्माण केला.आडगाव राजा येथील ७२ वर्षीय हरीभाऊ हिवाळे आणि ६७ वर्षीय त्यांची पत्नी वच्छलाबाई या शेतकरी दाम्पत्याला अपत्य नसले तरी त्याचे दु:खही त्यांनी कधी व्यक्त केले नव्हते. शेतीवर आपला चरितार्थ चालवत होते. दरम्यान, गेल्या दोन वर्षापूर्वी हरीभाऊ हिवाळे आजारी पडले. आणि २१जून रोजी रात्री त्यांचे निधन झाले. शनिवारी अंत्यविधीसाठी नातेवाईक जमा झाले. त्यावेळी मृत हरीभाऊ यांना पाणी कोण पाजणार अशी चर्चा सुरू झाली. उपस्थितांच्या या चर्चेला पूणर्विराम देत वच्छलाबाई हिवाळे यांनी स्वत:च पुढे होऊन मृत पतीला पाणी पाजत भडाग्नी दिला.धाडसाची चर्चापरंपरेला छेद देत वच्छलाबाई हिवाळे यांनी उचललेल्या या धाडसी पावलामुळे सर्वच आवाक झाले. दरम्यान, संपूर्ण आयुष्य एकमेकांच्या सहवासात घालवलेल्या पतीचे निधन झाल्याने भाऊक झालेल्या वच्छलाबार्इंच्या या धाडसाची सर्वत्र चर्चा होत आहे.
पतीच्या चितेला पत्नीने दिला अग्नी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 5:27 AM