रस्ता उठला नागरिकांच्या जीवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:24+5:30
भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे फाटक (खात रोड) असा रस्ता अद्यापही अर्धवट आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : रस्ता चौपदरीकरणाचे काम अखेरच्या टप्प्यात असताना भंडारा शहरातील खांबतलाव परिसरातील रस्त्याचे काम सहा महिन्यांपासून रखडले आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यातील पाणी नागरिकांच्या अंगावर उडत आहे. वळणावर अपघाताची भीतीही निर्माण झाली असून हा रस्ता नागरिकांच्या जीवावर उठला आहे. शहरातील सीमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले असताना हाच रस्ता का अपूर्ण असा प्रश्न शहरवासीयांना पडला आहे.
भंडारा ते तुमसर या राज्य मार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत आहे. भंडारा शहरातील जिल्हा परिषद चौक, राजीव गांधी चौक, खांबतलाव, खात रोड असे चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषद चौकापासून तुरुंगापर्यंत सीमेंटचा रस्ता तयार झाला असून पुढे रेल्वे फाटक (खात रोड) असा रस्ता अद्यापही अर्धवट आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र रस्ता निर्माणाधिन असल्याचे कारण पुढे करून रस्त्याचे खड्डे बुजविले जात नाही. एका आरो सेंटरचे पाणी सोडले जाते. ते पाणी रहदारीच्या रस्त्यावरील खड्ड्यात शिरते. घाणेरडे पाणी वाहनांमुळे नागरिकांच्या अंगावर उडते. महिला, विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
खामतलाव परिसरात बहिरंगेश्वर मंदिराजवळ रहदारीच्या रस्त्यावर भाज्यांची दुकाने लावली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.
अहोरात्र चालणाऱ्या या रस्त्यावर अपघाताची भीती नाकारता येत नाही. मोठे वळण असल्याने खात रोड कडून येणारे वाहन दिसत नाही. वाहतूक पोलीस या ठिकाणी कर्तव्य बजावत असले तरी वाहतुकीवर नियंत्रण मिळविण्यात अपयश येते. या सर्व प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी अॅड. एम. एस. ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिली आहे.
अपघाताची मालीका
तुरुंगापासून रेल्वे फाटकापर्यंत साधारणत: अर्धा किलोमीटर रस्त्याचे काम ठप्प झाले आहे. नेमके कोणत्या कारणाने काम थांबले आहे हे कळायला मार्ग नाही. या रस्त्यावर आंतरराज्यीज वाहतूक सुरु असते. मोठाले ट्रक आणि कंटेनर अहोरात्र धावत असतात. त्यातच शहरातील नागरिकांनाही याच रस्त्याचा उपयोग करावा लागतो. परिणामी अपघाताची भीती कायम असते. दररोज लहान सहान अपघात येथे घडत आहे. आठ दिवसापूर्वी धानाच्या पोत्याने भरलेले एक ट्रॅक्टर अचानक उलटले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही. मात्र काही काळ वाहतूक ठप्प होऊन नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.