अवकाळी पावसाने रबी हंगाम संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 06:00 AM2020-03-13T06:00:00+5:302020-03-13T06:00:15+5:30
सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासमवेत रंगपंचमी सण साजरा करत असतानाच अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
लाखांदूर : अवकाळी पावसाने तालुक्यातील रबी पीक संकटात आली असून होळीच्या पर्वात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गहू, हरभरा, लाखोरी पिकांची काढणी सुरू असतानाच झालेल्सर जोरदार पावसाने पीक उध्वस्त झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी प्रशासनाने सर्वेक्षण करण्याची मागणी होत आहे.
सध्या लाखांदूर तालुक्यात शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केली आहे. लाखोरी, हरभरा पिकांच्या कळपा शेतात ठेवल्या आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने अनेक शेतकऱ्यांनी पिकांची कापणी केल्यानंतर त्यावर काहीही झाकले नव्हते. मंगळवारी रंगपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबासमवेत रंगपंचमी सण साजरा करत असतानाच अचानक आलेल्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी उसनवार करून पिकांची पेरणी केली होती. मात्र रबी हंगामात अनेकदा झालेल्या अवकाळी पावसाने पुन्हा एकदा बळीराजावर संकट सापडले आहे.
शासनाने शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी होत आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टी आणि त्यानंतर रबी हंगामातील दोन ते तीनवेळा झालेल्या जोरदार पावसामुळे लाखांदूर तालुक्यात अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले आहे. शेतात पीके चांगली दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र उत्पादनाला मोठा फटका बसणार असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. यासाठी राज्य शासनाने शेतकऱ्यांना रबी हंगामातील पीक विम्यातून भरीव मदत देण्याची मागणी होत आहे. काही ठिकाणी धान पिकाचे उत्पादन चांगले झाले. मात्र त्याची विक्री करताना शेतकºयांना अनेक अडी अडचणींचा सामना करावा लागला. आजही अनेक शेतकऱ्यांना धान विक्रीसाठी टोकन मिळाले असतानाही खरेदी केंद्रांवर धान विक्री होत नाही. एकीकडे टोकन देवून शेतकºयांना दिलासा दिला जातो. तर दुसरीकडे महिना उलटला तरी शेतकऱ्यांचे धान खरेदी केले जात नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी त्रस्त झाले आहे.
आधारभूत धान खरेदी केंद्रावरील समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांनी अनेकदा लाखांदूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. यासंदर्भात तहसीलदारांची भेट घेवून धान खरेदी केंद्रावरील समस्या निदर्शनास आणून दिले आहे. यावर अद्यापही उपाययोजना झालेली नाही.