संशयावरून आणखी ११ व्यक्ती क्वारंटाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 05:00 AM2020-04-04T05:00:00+5:302020-04-04T05:00:44+5:30
११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्तींना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : दिल्ली येथील निजामुद्दीनच्या तबलिग जमात मरकज काळात रेल्वे प्रवास करणाऱ्या शहरातील ११ व्यक्तींना संशयावरून शुक्रवारी हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले. आता जिल्ह्यातील दोन जण मरकजमध्ये सहभागी झाल्याचे उघड झाल्यानंतर त्यांना गुरूवारी हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले होते. ११ जणांच्या स्वॅबचे नमूने नागपूर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.
भंडारा जिल्ह्यातील काही व्यक्ती दिल्ली येथील मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला तीन दिवसापुर्वी मिळाली होती. त्यांचा शोध सुरू करण्यात आला. दरम्यान बुधवारी दोन व्यक्तींना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. दरम्यान प्रशासनाकडून शोध सुरू असताना शुक्रवारी संशयावरून ११ व्यक्तींना हॉस्पिटल क्वारंटाईन करण्यात आले. मात्र चौकशीत ते मरकजमध्ये सहभागी झाल्याचे आढळून आले नाही. ९ मार्च रोजी सात जण संपर्कक्रांती एक्सप्रेसने दिल्लीहून नागपूरला पोहचले. तेथून १२ मार्चला भंडारा येथे दाखल झाले. त्यांच्याकडील रेल्वे प्रवासाच्या तिकीटही उपलब्ध असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर उर्वरित चार जण १५ मार्च रोजी गोंडवाना एक्प्रेसने जनरल डब्यातून प्रवास करत १६ मार्चला भंडारा येथे पोहचले होते. या सर्वांना येथील नर्सिंग वसतीगृहाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ११ व्यक्तींच्या घशातील स्वॅबचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे प्रसिद्धी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना केल्या जात असून हॉस्पिटल क्वारंटाईन आणि होम क्वारंटाईन केले जात आहे. विलगीकरण कक्षात आता ३४ जणांना दाखल करण्यात आले असून तेथून २२ जणांना सुटी देण्यात आली आहे.
१२ हजारावर व्यक्ती होम क्वारंटाईन
जिल्ह्यातील १० व्यक्ती आयसोलेशन वॉर्डात
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करीत असून जिल्ह्यातील दहा व्यक्तींना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले आहे.
मुंबई-पुण्यासह महानगरातून जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १२ हजार व्यक्ती दाखल झाल्या होत्या. त्यांची रॅपिड रिस्पॉन्स टीमने भेट घेवून सूचना दिल्या. या सर्वांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात आला आहे. तर परदेशातून आलेल्या २२ जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्वाेतोपरी उपाययोजना केल्या जात असून जिल्ह्यातील सीमावर्ती भागातील नऊ चेकपोस्टवर प्रत्येकाची वैद्यकीय पथकामार्फत तपासणी केली जात आहे.