चार अल्पवयीन मुलांनी केला युवकाचा खून; जुना वाद नडला, चारही आरोपींना अटक
By गोपालकृष्ण मांडवकर | Updated: May 9, 2026 17:58 IST2026-05-09T17:56:54+5:302026-05-09T17:58:08+5:30
Bhandara : काही दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या वादाची तक्रार पोलिसातून मागे घेण्यावरून झालेल्या वादात चार विधीसंघर्षग्रस्त बालकांनी एका २८ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री शहरात घडली.

Four minors murder a young man; Old dispute unresolved, all four accused arrested
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : काही दिवसांपूर्वी झालेल्या जुन्या वादाची तक्रार पोलिसातून मागे घेण्यावरून झालेल्या वादात चार विधीसंघर्षग्रस्त बालकांनी एका २८ वर्षीय युवकाचा खून केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री शहरात घडली. दरम्यान तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी अवघ्या काही तासातच चार जणांना ताब्यात घेऊन अटक केली.
ही घटना शहर पोलिस ठाण्यापासून अगदी १०० मिटर अंतरावर असलेल्या जलाराम चौक परिसरात मध्यरात्री १२:३० वाजताच्या सुमारास घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. कार्तिक विलास भंडारी (२८) असे मृत युवकाचे नाव असून तो जलाराम चौक परिसरात संताजी वॉर्डात राहतो. घटनेच्या रात्री त्याचे काही युवकांसोबत भांडण झाले. या वादात तरूणांनी धारदार शस्त्राने भोसकून त्याला ठार केले. घटनेची माहिती मिळताच भंडारा पोलिसांनी घटनास्थळी पोहचून नातेवाईकांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेते, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
चारही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरूद्ध भंडारा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१). १८९(४), १९०, १९१(२) आणि १९१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणेदार उल्हास भुसारी यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.