जिल्ह्यात १४ लाख नागरिकांचे डोअर-टू-डोअर सर्वेक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:00 AM2020-04-03T05:00:00+5:302020-04-03T05:00:22+5:30
कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या घनिष्ठ व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाडीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरु केली आहे.
देवानंद नंदेश्वर।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : कोव्हीड-१९ रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली असून जिल्ह्यातील १४ लाख नागरिकांचे दररोज डोअर-टू-डोअर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहे. या सर्वेक्षणाला गाव पातळीवर सुरुवात झाली असून १२९० अंगणवाडी सेविका आणि ११९० आशा स्वयंसेविका दारोदारी जाऊन सेवा देत आहेत. कोरोनाचे उच्चाटन होईपर्यंत दररोज सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांना आरोग्य विभागाने दिले आहेत.
कोरोना पॉझिटीव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या घनिष्ठ व्यक्तींना बाधा होण्याची दाट शक्यता असते. नागरिक आपल्याला इतर लोक वाडीत टाकतील म्हणून खरी माहिती सांगत नाही. ही माहिती प्रशासनाला मिळावी म्हणून दररोज सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. त्याची अंमलबजावणी आरोग्य विभागाने सुरु केली आहे.
छोट्या गावांमध्ये अंगणवाडी सेविका आणि आशा यांच्या मदतीने हा सर्वे केला जात आहे. तर मोठ्या गावामध्ये आरोग्य सेवक व आरोग्य सेविका मदतीला आहे. हा सर्वे पुर्ण करताना सर्दी, खोकला, ताप याची स्वतंत्र कॅटेगरी करण्याचे आदेश आहेत. तर कोरडा खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणाऱ्या व्यक्तीचा स्वतंत्र वर्ग तयार करण्यात आला. या व्यक्तींना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर तत्काळ तालुक्याला रेफर करण्याच्या सूचना आहेत. हे सर्वेक्षण पार पाडणाºया व्यक्तीची आरोग्य विभाग विशेष काळजी घेत आहेत. त्यांना मास्क, सॅनिटायझर पुरवित असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. गोळा झालेली माहिती दररोज अपडेट करुन आॅनलाईन पाठविण्याच्या सूचना आहेत. यामुळे गावात कुठला नविन रुग्ण आढळल्यास तत्काळ माहिती मिळणार आहे.
ग्रामसेवकही सरसावले
गावातील प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवकाची गणना केली जाते. भंडारा जिल्ह्यातील ग्रामसेवक दररोज गावाला भेटी देवून परगावाहून गावात दाखल झालेल्या व्यक्तींची माहिती गोळा करुन प्रशासनाला पाठवित आहेत. यासाठी दररोज ग्रामपंचायतमध्ये सोशल डिस्टंन्स् ठेवून सभा घेतली जात आहे. यासभेमध्ये तलाठी, सरपंच, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशा आदींचा समावेश असतो. सभा आटोपल्यानंतर गृहभेटी दिल्या जात असून त्यांना कोरोना विषयी माहिती दिली जात आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून अंगणवाडी सेविकांचे मानधन झालेले नाही. मात्र देशावर आलेले संकट लक्षात घेता अंगणवाडी सेविका आरोग्य विभागाच्या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत आहेत. सर्वेक्षण करताना त्यांना कोरोनाची लागन होवू नये यासाठी मात्र त्यांना साहित्यांचा पूरवठा करावा.
-दिलीप उटाणे, हिवराज उके, पदाधिकारी, आयटक