कर्तव्यदक्ष पोलिसांच्या माणुसकीतील गहिवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 05:00 AM2020-08-14T05:00:00+5:302020-08-14T05:01:12+5:30
तिची दैनिय अवस्था बघून केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक जाधव आणि सहकारी पोलिसांनी जून महिन्यापासून अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तिला आपले स्वगावी उत्तर प्रदेशातील मूळ गावी जायची ओढ लागली. जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे ठाणेदार दिपक जाधव यांनी तिला १३ ऑगस्टचे ट्रेनचे तिकीट काढून दिले आहे. नागपूरला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली.
संजय कुमार बंगळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : कठीण दगडाखाली स्वच्छ व निर्मळ पाण्याचा झरा असतो, किंवा वरून टणक दिसणाऱ्या नारळाच्या आत मऊ खोबरे असते हा सुविचार बºयाच वेळा आपल्याला संवादातून ऐकायला मिळतो. असाच काहीसा अनुभव नेहमी कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय व प्रसंगी कठोर दिसणारे पोलीस बांधव हे ही माणसेच आहेत. त्यांच्या मनातही कुठेतरी खोल कप्प्यात प्रेम, वात्सल्य अनुभूती बघायला मिळते. अशा कर्तव्यदक्ष पोलीस बांधवांच्या मनातही माणुसकीचा गहिवर असतो याचा प्रत्यय नुकताच केशोरी पोलिस स्टेशन अंतर्गत अनुभवायला आला.
सध्या संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात सापडले आहे. कोरोना नावाचा भयंकर अजगर दिवसेंदिवस विळखा घालत आहे. अशातच उत्तर प्रदेशातील चपराई, सिकंदरपूर येथील ३० वर्षीय महिला पिंकी प्रेम शंकर २६ फेब्रुवारी रोजी हिच्या वडीलांचे निधन झाल्यामुळे २९ फेब्रुवारी रोजी अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहेरी जरूघाटा येथे कुटुंबासह आली. याच काळात लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे तिला आपल्या मूळ गावी परत जाता आले नाही. ती आली तेव्हा गरोदर होती. २० मे रोजी तिची प्रसूती होऊन तिने सुंदर, गोंडस मुलीला जन्म दिला. याआधीही तिला दोन मुली आहेत. कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यामुळे पोटापाण्याचा प्रश्न भागवण्यासाठी मदत मिळण्याच्या अपेक्षेने ती केशोरी पोलीस स्टेशनला आली. तिची दैनिय अवस्था बघून केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक जाधव आणि सहकारी पोलिसांनी जून महिन्यापासून अन्नधान्य व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. तिला आपले स्वगावी उत्तर प्रदेशातील मूळ गावी जायची ओढ लागली. जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केशोरीचे ठाणेदार दिपक जाधव यांनी तिला १३ ऑगस्टचे ट्रेनचे तिकीट काढून दिले आहे. नागपूरला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करून दिली. एरव्ही कठोर शिस्त असणाऱ्या पोलीस बांधवांच्या मनात निर्माण झालेला हा माणुसकीचा गहिवर कोरोना काळात बरेच काही सांगून जातो. कोरोना काळात माणसामाणसांमध्ये फिजिकल डिस्टन्स ठेवा मात्र माणुसकीपासून दूर जाऊ नका हा संदेश देणारे हे वास्तव आहे.केशोरी पोलीस बांधवांच्या या स्तुत्य कामिगरीला सलाम! या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.