Kandenavami 2025 : हिंदू संस्कृतीत प्रत्येक दिवस 'साजरा' करण्यासाठी काही ना काही निमित्त शोधले जाते, नव्हे तर ते मिळते! जसे की आषाढ तळण! यालाच आखाड तळणे असेही म्हणतात. २६ जून रोजी व्रत वैकल्यांनी नटलेला आषाढ मास सुरू होत आहे आणि इथून पुढे चार महिने विविध उत्सवाचे वातावरण सुरूच राहणार आहे. उत्सवाच्या निमित्ताने घरात गोड धोड करणे ओघाने आलेच, पण तळण-पुरण हे समीकरणही जुळून यावे, म्हणून आपल्या पूर्वजांनी 'आषाढ तळण' या नावाने आषाढाचे पहिले दहा दिवस चमचमीत पदार्थ खाण्याची सवलत दिली आहे.
आज आषाढ शुद्ध नवमी, आजची तिथी कांदेनवमी म्हणून ओळखली जाते. कारण इथून पुढे म्हणजेच आषाढी एकादशीपासून(Ashadhi Ekadashi 2025) कार्तिकी एकादशीपर्यंत(Kartiki Ekadashi 2025) चातुर्मास(Chaturmas 2025) सुरू होणार असतो. या महिन्यात कांदा लसूण वर्ज्य केले जाते. म्हणून चातुर्मासाआधी ते संपवण्याची केलेली तजवीज म्हणजे कांदेनवमी.
आपल्या पूर्वजांनी अतिशय विचारपूर्वक सणांची, संस्कृतीची आणि खाद्यपदार्थांची सांगड घातली आहे. आषाढ तळण त्यापैकीच एक आहे. आषाढ महिन्यात मुबलक पाऊस पडतो. अशा वातावरणात केवळ कांदा भजीच नाही तर अनेक तळणीच्या पदार्थांचा समाचार घेतला जातो. मे महिन्यात केलेले वाळवणाचे पापड, कुरडया, सांडगे, शेवया यांना आषाढापासून न्याय द्यायला सुरुवात होते. श्रावणात व्रत वैकल्यांमुळे खाण्यावर निर्बंध येतात. त्यामुळे आषाढ तळण अगदी दणक्यात पार पाडले जाते. हे घरगुती पदार्थ जिभेचे चोचले तर पुरवतातच, शिवाय पावसाळ्यात शरीराला आवश्यक घटकही पुरवतात.
पूर्वी तळणीच्या पदार्थांच्या यादीत गोड तसेच तिखट मिठाच्या पुऱ्या, खारे शंकरपाळे, चकल्या, शेव, भजी, कडबोळी, अळू वडी, कोथिंबीर वडी, पुडाची वडी असे नानाविध पदार्थ केले जात असत. त्याला खीर, लाडू, शिरा इ. गोड धोड पदार्थांची जोड असे. तळणीचे पदार्थ खाऊन अपचन होऊ नये म्हणून मुगाची खिचडी व आले पाकची वडी याचाही समावेश केला जातो. आता त्यात नवनव्या खाद्यपदार्थांची भर पडते आणि आखाड तळला जातो.
कांदे नवमी हे देखील एक निमित्त! धार्मिक कार्यात, देवाला नैवेद्य दाखवताना कांदा, लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. चातुर्मासात दरदिवशी काही ना काही व्रत वैकल्ये असतात. त्यात यंदा अधिक श्रावण मास, म्हणजे श्रावणाच्या आधी अधिक महिना येतोय. तो महिना भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे त्या काळात तर अजिबातच कांदा, लसूण वापरत नाहीत आणि जोडून येणाऱ्या श्रवणातला तर प्रत्येक दिवस महत्त्वाचा! अशा वेळी घरात कांदे भरून ठेवले तर पावसाळी वातावरणात ते कुजून जातील आणि घरात दुर्गंध पसरेल, म्हणून पूर्वीचे लोक नवमीच्या तिथीला घरातील कांदा लसूण संपवून टाकत असत.
धार्मिक कार्यात, देवाला नैवेद्य दाखवताना कांदा, लसूण असलेले पदार्थ देवाला अर्पण करत नाहीत. ते पावित्र्य जपले जाते. पलाण्डुभक्षणं पुनरुपनयम् ही शास्त्रोक्ती बऱ्याच वेळा कानावर येते. म्हणजे कांदा भक्षण केल्यावर पुन्हा मुंज करावी असे धर्मशास्त्र सांगते. यातच धर्मशास्त्राने कांदा सेवनाला केलेला निषेध लक्षात येतो.
कांदा सोलत गेल्यास शेवटी आत राहणारा कोंब हा मनोव्यापार चाळवणारा आहे. म्हणून कांद्याला कंदर्प म्हणजे मदन म्हटले आहे. कांद्याचे सेवन केल्यास त्याचा परिणाम रक्तात असेपर्यंत कामवासनात्मक विचार मनात थैमान घालतात. कांदा खाल्यावर काही वेळाने वीर्याची घनता कमी होते व गतीमानता वाढते. परिणामी विषयवासना वाढते. शिवाय पावसाळ्यात कांदा खाल्यास अपचन, अजीर्णसारखे उदरविकार संभवतात. इतके असूनही आयुर्वेदाने कांदा व लसूण यांचा समावेश औषधी वनस्पतीत केला आहे. हृदयरोग असल्यास लसूण उपकारक ठरतो.
मात्र सद्यस्थितीत म्हणाल, तर कांदा-लसणाशिवाय आपले पान हलत नाही. चमचमीत पदार्थ करायचे झाले की त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते. जिभेचे चोचले पुरवायचे म्हणजे त्यांना शरण जाणे ओघाने आलेच. त्यामुळे कांदेनवमीला कांदे भजीचा फडशा पाडून परत कांदा लसूण खाणारे लोक आहेच. अशावेळी किमान सणवारी पथ्य पाळावे असा नेम आपण नक्कीच करू शकतो. आपल्या सणांचे पावित्र्य आपण जपले नाही तर पुढच्या पिढीला कोण या गोष्टींचे महत्त्व सांगणार?
त्यामुळे आपणही काही पथ्य, नियम स्वतःला लावून घेऊया, आपल्या धर्मसंस्कृतीचे पालन करूया आणि कांदेनवमी मजेत साजरी करूया!