विहिर आजपर्यंत कधीच आटली नाही
By Admin | Updated: July 17, 2014 00:57 IST2014-07-17T00:46:11+5:302014-07-17T00:57:23+5:30
अंबाजोगाई: पाऊस पडला नाही की, धरणे, नद्या, बोअर व विहिरीचे पाणी आटते.

विहिर आजपर्यंत कधीच आटली नाही
अंबाजोगाई: पाऊस पडला नाही की, धरणे, नद्या, बोअर व विहिरीचे पाणी आटते. परंतु अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरातील विहिरीची गोष्टच निराळी आहे. ही विहीर केवळ २० फूट खोल असून, या विहिरीचा जलस्त्रोत आजपर्यंत कधीच आटला नाही. याचा आधार ग्रामस्थांना गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.
जिल्ह्यात पाणीसमस्या दिवसेंदिवस बिकट बनली असतानाच जून महिन्यात येणारा पाऊस जुलै महिन्यात पडू लागला. त्यामुळे पाणीपातळी खालावली. आजघडीला ग्रामीण भागात तीनशे फुटापर्यंत बोअर घेऊनही पाणी लागत नाही. मात्र लोखंडी सावरगाव येथील विहीर वीस फूट आहे. या विहिरीला नेहमीच पाणी असते. कितीही उन्हाळे आले, गेले तरीही या विहिरीला पाणी कसे राहते? हा विषय अनेकांसाठी रहस्य बनलेला आहे. गावात जवळपास शंभर ते दीडशे बोअर आहेत. यावर्षी घेतलेल्या बोअरची संख्याही लक्षणीय आहे. अशी परिस्थिती असली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील विहिरीची किमया निराळी आहे. ७५ वर्षांपूर्वी खोदलेल्या विहिरीची खोली २० फुटांपेक्षा अधिक नाही. रुंदीही कमी आहे.
अगदी सकाळी ५ वाजल्यापासून पाणी भरण्यास या विहिरीवर गर्दी होते. गेल्या तीन ते चार वर्षात अंबाजोगाई तालुक्यात पाणी समस्येत वाढ झाली आहे. मात्र लोखंडी सावरगाव येथील ग्रामस्थ या एकट्या विहिरीच्या भरवशावर असतात. निसर्गाच्या या किमयेने अनेकांची तहान तर भागवलीच, शिवाय या पाण्यावरच अनेक घरेही बांधली गेली. या पाण्याचा जलस्त्रोत कधीच आटला नसल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत. (वार्ताहर)