५२४ ग्रामपंचायतींच्या प्रशासकांवर गंडांतर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 05:00 AM2020-07-09T05:00:00+5:302020-07-09T05:01:16+5:30
कोरोनाचा उद्रेक राज्यातील काही जिल्ह्यांत सुरू झाला. निवडणूक सभा-बैठकींमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच आयोगाने आहे त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक थांबविली. यानंतर या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील ५२४ ग्रामपंचायतींच्या प्रशासक तथा पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांवर सोमवारच्या अध्यादेशाने गंडांतर आले आहे. अधिकाऱ्यांऐवजी शासनाला योग्य वाटेल त्या व्यक्तीची निवड करण्यात येणार असल्याने इच्छुक सरसावले आहेत.
जिल्ह्यात एप्रिल ते जून २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आयोगाने आहे त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत रद्द केल्याने या ठिकाणी प्रशासकपदी संबंधित पंचायत समितीचे विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.त्यामुळे एका अधिकाऱ्याकडे अनेक ग्रामपंचायतींचा प्रभार आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये प्रशासक हा ‘बारा गावचा कारभारी’ ठरल्याने कामकाजाला मर्यादा आल्या आहेत. या सर्व ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपुष्टात येण्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाद्वारे निवडणुकीची प्रक्रिया फेब्रुवारी अखेरपासून सुरु करण्यात आली होती. यानुसार ३० मार्चला मतदानाची प्रक्रिया अपेक्षित होती. म्हणजेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्व ग्रामपंचायतींमध्ये सरपंच व उपसरपंच निवडीची पहिला सभा होऊन नवीन पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ सुरू झाला असता. यादरम्यान कोरोनाचा उद्रेक राज्यातील काही जिल्ह्यांत सुरू झाला. निवडणूक सभा-बैठकींमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच आयोगाने आहे त्या टप्प्यावर पुढील आदेशापर्यंत ग्रामपंचायतींची निवडणूक थांबविली. यानंतर या ठिकाणी प्रशासक नियुक्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
जिल्ह्यात निवडणूक रखडलेल्या ५२४ ग्रामपंचायतींमध्ये पंचायत समितीच्या विस्तार अधिकाºयांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अमरावती तालुक्यात ४६, भातकुली ३४, नांदगाव खंडेश्वर ४४, चांदूर रेल्वे २८, धामणगाव रेल्वे ५३, तिवसा २७, मोर्शी ३९, वरूड ४१, अचलपूर ४०, दर्यापूर ४८, अंजनगाव सुर्जी ३४, चांदूर बाजार ४१, धारणी ३२ व चिखलदरा तालुक्यात १७ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
अध्यादेशामध्ये योग्य व्यक्ती असा उल्लेख असला तरी स्पष्टता नाही. ग्रामपंचायत अधिनियमानुसार विस्तार अधिकाºयांपेक्षा कमी दर्जाचा अधिकारी नको हे स्पष्ट आहे.
- दिलीप मानकर
डेप्युटी सीइओ (पंचायत)