लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मनपा निवडणुकीत भाजप सर्वाधिक जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र, थेट सत्ता स्थापन करताना त्यांना कुबड्यांची गरज लागणार आहे. बहुमताच्या गणितात भाजपचे नाव आघाडीवर असले, तरी सत्ता स्थापनेच्या केंद्रस्थानी युवा स्वाभिमानचे आमदार रवी राणा आहेत. त्यांच्याकडे १५ सदस्यांचा 'मॅजिक फिगर' हा महापालिकेवर भगवा फडकविणार असल्याचे चित्र तूर्तास निर्माण झाले आहे.
महापौर पदाचे आरक्षण चालू आठवड्यात जाहीर होण्याचे संकेत आहे, त्यानंतर वेगवान घडामोडी सुरू होतील, असे दिसून येते. भाजपने निवडणुकीत अमरावती महापालिका '५५ प्लस' चा नारा देत माहौल उभा केला होता. तथापि, तिकीट वाटपात झालेला गोंधळ आणि इच्छुकांची नाराजी भाजपला निवडणूक संपेपर्यंत 'डॅमेज कंट्रोल' करता आले नाही. त्यामुळे भाजपचे बेल्ट असलेल्या प्रभागातही मार खावा लागला. परिणामी मतांचे विभाजन झाल्याने काही प्रभागांत बसप, वायएसपी, घड्याळाने मुसंडी मारली. अशातच तिकीट न मिळाल्याने भाजपच्या १५ जणांनी वेगळ्या पक्षांची उमेदवारी मिळविली. याचा फटका भाजपला बसला. आता सत्तेसाठी ४४ हा आकडा जुळविण्यासाठी आमदार रवी राणा यांनी पुढाकार घेतला असून, ते शिंदेसेना, बसप, उद्धवसेना नेत्यांशी बोलणी करीत असल्याची माहिती आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) चे समीकरण बिघडले
महापालिका निवडणुकीत नवनीत राणा विरुद्ध एमआयएम असा संघर्ष उभा राहिल्यास त्याचा फायदा भाजपला होईल, असा अंदाज होता. मात्र, त्याचा उलट परिणाम झाला. अल्पसंख्याक विशेषतः मुस्लीम मते मोठ्या प्रमाणात एमआयएमकडे वळली. १२ जागांवर विजय मिळवत एमआयएमची ताकद वाढली. मुस्लीम मतांचे गणित जुळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी (अजित पवार) ला फारसे यश आले नाही. मुस्लीम मते एका बाजूने वळली आणि या दोन्ही पक्षांचे राजकीय समीकरण बिघडले. वंचितलाही एकच जागा मिळू शकली.
असे आहे पक्षीय बलाबल
भाजप - २५
काँग्रेस - १५
युवा स्वाभिमान - १५
एमआयएम - १२
राष्ट्रवादी (अ. प.) - ११
शिंदेसेना - ३
उद्धवसेना - २
बसप - ३
वंचित बहुजन आ. - १
निवडणुकीत राणांशी युती तोडणे भोवले
महापालिका निवडणूक अवघ्या चार ते पाच दिवसांवर आली असताना, भाजपने युवा स्वाभिमान यांच्याशी युती तोडली. पाच जागांवर भाजपने अपक्षांना समर्थन जाहीर केले. त्यामुळे मतदारांनी हिंदुत्ववादी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी काही प्रभागांत युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे १५ उमेदवार निवडून आले असून, आमदार रवी राणांची राजकीय ताकद वाढल्याचे सिद्ध झाले.
राणा म्हणतात, महापौर भाजपचाच होईल
युवा स्वाभिमानने १५ जागांवर विजय मिळवल्याने आमदार रवी राणांची सत्ता स्थापनेतील भूमिका निर्णायक बनली आहे. तसेही आमदार राणांनी निवडणुकीपूर्वीच अमरावती महापालिकेत महापौर भाजपचाच होईल, असे जाहीर केले होते. तसा शब्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिला, असे आमदार राणा आजही सुद्धा तेच सांगत आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता स्थापनेच्या केंद्रस्थानी रवी राणा हेच असतील, असे एकूणच राजकीय चित्र दिसून येत आहे.
Web Summary : BJP won most seats, but needs support. Ravi Rana's party holds the key to forming the Amravati government. Alliances are shifting after the election results.
Web Summary : भाजपा ने सबसे अधिक सीटें जीतीं, लेकिन समर्थन की आवश्यकता है। रवि राणा की पार्टी अमरावती में सरकार बनाने की कुंजी रखती है। चुनाव परिणामों के बाद गठबंधन बदल रहे हैं।