- तर लोकांना मरू द्यायचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:16 AM2021-02-25T04:16:06+5:302021-02-25T04:16:06+5:30

अमरावती - ‘ब्रेक के बाद’ अमरावती शहरात अचानक आक्राळविक्राळरीत्या वाढू लागलेल्या कोराेनामुळे जगभरातील कोरोनाशास्त्रज्ञांचे लक्ष अमरावतीकडे वेधले गेले. दररोज ...

- So why let people die? | - तर लोकांना मरू द्यायचे काय?

- तर लोकांना मरू द्यायचे काय?

Next

अमरावती - ‘ब्रेक के बाद’ अमरावती शहरात अचानक आक्राळविक्राळरीत्या वाढू लागलेल्या कोराेनामुळे जगभरातील कोरोनाशास्त्रज्ञांचे लक्ष अमरावतीकडे वेधले गेले. दररोज मृत्यूचे चिंताजनक आकडे समोर येत असतानाही नागरिकांनी कोराेना प्रतिबंधासाठीच्या त्रिसूत्रीचा अवलंब गांभीर्याने न केल्यामुळे लाॅकडाऊन गरजेचा ठरला. अमरावती जिल्ह्याचे पालकत्व शिरावर असलेल्या पालकमंत्र्यांनी तो घोषित केलाही. आता लाॅकडाऊन घोषित करताना मान न दिल्याच्या मुद्द्यावरून काही लोकप्रतिनिधींनी राजकारण आरंभले आहे. लाॅकडाऊन गैरजरूरी, असेही मतप्रदर्शन त्यांनी केले आहे. कोराना जिवावर उठला असताना, नागरिकांना सुपर स्प्रेडर बनून सर्वत्र फिरू द्यायचे काय, अमरावतीकरांना मरू द्यायचे काय, असे प्रश्न निर्माण होतात.

अविश्वसनीय संक्रमणक्षमतेमुळे अमरावतीतील कोराेना लक्षवेधी ठरला आहे. जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि आयसीएमआरची नजर त्यामुळेच आता अमरावतीवर खिळली आहे. आताचा विषाणू ‘हायली इन्फेक्शियस’ असावा, असा एक मतप्रवाह आहे. यापूर्वीच्या कोराना विषाणूच्या तुलनेत अनेकपटींनी संसर्गक्षमता अधिक असलेला नवा स्ट्रेन अमरावतीत आढल्यामुळे संसर्ग वेगाने होत असल्याच्याही बातम्या बाहेर आल्यात. नव्या स्ट्रेनचा मुद्दा जागतिक आरोग्य संघटना, राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळा आणि आयसीएमआर यांच्याशी संबंधित असल्यामुळे राष्ट्रीय पातळीहून त्यावर अधिकृतरीत्या भाष्य केले जाईलच. त्यासाठी शास्त्रीय पद्धतीनुसार अमरावतीतून १०० नमुने विषाणू प्रयोगशाळांमध्ये पाठवण्यात आलेदेखील. मंगळवारी त्यावर भाष्य केले जाऊ शकेल.

या शास्त्रीय तपशिलांचा अर्थ इतकाच की, अमरावतीवर घोंघावणारे संकट हे जगभरातील नियमित कोराना संकटासारखे नसून, ते त्याहूनही ते अधिक गंभीर असू शकते, या निष्कर्षाप्रत जागतिक आरोग्य संघटना आणि विषाणू विज्ञान प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञ पोहोचले आहेत. शास्त्रज्ञांना वाटते त्याप्रमाणे हा नवाच स्ट्रेन - अर्थात ब्राझिल, ब्रिटन आणि आफ्रिका या देशांमध्ये आढळलेल्या स्ट्रेनपेक्षाही वेगळा स्ट्रेन पुढे आला, तर जगभरात एक नवाच स्ट्रेन अमरावतीत आढळून आल्याची ती आंतराष्ट्रीय घटना असेल. जगभरातील मीडियातील ती महत्त्वाची बातमी ठरेल. अमरावती महानगरातील कोरोनाचे गंभीर्य अशा संवेदनशील पातळीवर असताना, बडनेऱ्याचे अनुभवी आमदार रवि राणा आणि जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी लाॅकडाऊन गैरजरूरी असल्याचे किंवा लाॅकडाऊन चुकीचे असल्याचे विधान करणे हे ना शास्त्रीय आहे, ना लोकाराेग्याच्या दृष्टीने उपयोगी. कोराना किती गंभीर स्वरूप धारण करू शकतो, याचा अनुभव स्वत: राणा दाम्पत्याने घेतला आहेच. राणा दाम्पत्यासाठी जिवावर उदार होऊन धावणाऱ्या एका तरुण कार्यकर्त्याचा जीव याच कोराेनाने हिरावला, याचेही येथे आवर्जून स्मरण होते. कोरानाचा डंख असाच घातक आहे. त्याची रूपेही अनेक. ज्यांना काहीच झाले नाही, त्यांच्यासाठी कोराना विनोद ठरतो; परंतु ज्यांच्या घरातील जीव हिरावून नेला, त्यांच्यासाठी कोराना काळ ठरतो.

काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनीही लाॅकडाऊनची घाई झाल्याचे विधान केले. या विधानाला ना वैद्यकीय आधार आहे, ना शास्त्रीय दृष्टिकोन. ते वक्तव्य राजकीय स्वरूपाचे ठरते. अशा वक्तव्यांचा राजकीय लाभ होऊ शकेलही, परंतु राजकारण इतर अनेक मुद्द्यांवर करता येणे शक्य आहे. लोकप्रतिनिधींना लोकांनी निवडून दिले आहे. लोकांच्या आयुष्यरक्षणासाठी अशा भयावह संकटसमयी सर्वांचीच वज्रमूठ लोकांना अपेक्षित आहे.

लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी बैठक घेतली नाही, आम्हाला बोलविले नाही, असा आरोप या लोकप्रतिनिधींचा आहे. कोरोनापासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी गर्दी करू नका, मास्क घाला, सोशल डिस्टंसिंग पाळा, असा आग्रह लोकप्रतिनिधी धरू शकले असते. परंतु, राणा दाम्पत्य शिवजयंतीदिनी विनामास्क शहरभर फिरले. त्यातून कुणी काय संदेश घ्यावा? लाॅकडाऊनचा पर्याय प्रगत राष्ट्रांतून आम्हाला मिळालेला आहे. साखळी तोडण्यासाठी अनेक वर्षांपूर्वीही तो वापरला गेला आहे. वाढत्या काेरोनावर अत्यावश्यक उपाय योजण्याच्या हेतुने पालकमंत्र्यांनी त्यांना असलेले अधिकार वापरून लाॅकडाऊन घोषित केला. जिल्हाधिकऱ्यांनीही तत्पूर्वी त्यांचे अधिकार वापरून विकेन्ड कर्फ्यू घोषित केला होताच. औषधी चवीला कितीही कडू असली तरी आजार वाढू देण्याऐवजी कडूपणा स्वीकारून ती घेणे जसे आरोग्यासाठी हितकारक, लाॅकडाऊनही तसाच काही अडचणींसह आयुष्यरक्षणासाठी स्वीकारणे आवश्यकच आहे.

Web Title: - So why let people die?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.