लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोनापासून बचाव करण्यासाठी आता बहुतांश नागरिक लसीकरणाला प्राधान्य देत आहे. मात्र, शहरासह ग्रामीण भागातील केंद्रावर लसींचा तुटवडा असल्याने प्रचंड गर्दी होत आहे. आता १८ ते ४४ वयाेगटातील तरुणांच्या लसीकरणास ब्रेक लावण्यात आला आहे. परंतु, ४५ वर्षावरील नागरिकांची लस टोचून घेण्यापूर्वी टोकन प्राप्त करण्यासाठी एकच गर्दी होत आहे. काही केंद्रावर पहाटे ४ पासून रांगा लागत असल्याचे चित्र आहे.आरोग्य यंत्रणेकडून गुरूवार, शुक्रवार अशा दोन दिवसांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डचा १६ हजार २०० एवढा साठा केंद्रावर पोहचविण्यात आला. त्यापैकी ग्रामीण भागात काही केंद्रावर शुक्रवारी लस संपली होती. त्यामुळे आता शनिवार, रविवार असे पुन्हा दोन दिवस केंद्रावर लसींचा ठणठणाट असणार आहे. लसींचे वाटप केंद्रावर मागणी आणि वापरानुसार करण्यात येत आहे. ४५ वयोगटावरील व्यक्तींनाच लस दिली जात आहे. त्याशिवाय केंद्रावर होणारी गर्दी ही पुन्हा कोरोना फैलाव करणारी ठरत असल्याने तासानिहाय टोकनचे वाटप करण्यात येत आहे. लसीकरणासाठी टोकन देताना नागरिकांना आराेग्य कर्मचारी वेळ निश्चित करीत असून, त्याचवेळी लस देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. मात्र, ज्येष्ठ नागरिक पहाटे लसीकरणास पसंती देत असून, टोकन मिळविण्यासाठी लांबलचक रांगा लागत आहे.
शनिवार, रविवार असे दोन दिवस अमरावती महानगरातील १५ केंद्रांवर लस उपलब्ध असणार आहे. प्राप्त पाच हजार लसीनुसार नियोजन करण्यात आले आहे. केंद्रावर लसींची नोंदणी आणि मागणी विचारात घेण्यात लस पुरविली जात आहे.- विशाल काळे, वैद्यकीय अधिकारी, महापालिका