लॉकडाऊनने बदलली लग्नाची परंपरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 05:00 AM2020-07-03T05:00:00+5:302020-07-03T05:00:34+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
चांदूर बाजार : लग्न समारंभ म्हटले म्हणजे अमुुक परिवारापेक्षा आपला थाट जादा हवा, अशी चढाओढ लागते. त्यांच्या मुलीच्या लग्नात जेवलेल्या वऱ्हाडापेक्षा आपल्या येथे जास्त लोक जेवले पाहिजे, हा प्रौढीचा मुद्दा झाला आहे. त्यातच धावपळ, मानसन्मान, रुसवे-फुगवे आले. लग्नकार्य पूर्ण होईपर्यंत वधुपिताच्या जिवाची धाकधूक सुरूच असते. कोरोनाने या सर्वांना फाटा देत अगदी मोजक्या लोकांमध्ये लग्नसमारंभ करण्याचा मंत्र दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी न करण्याचे आवाहन प्रशासनाने केल्यामुळे सध्या साध्या पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत आणि भविष्यातही अशाच पद्धतीने लग्न समारंभ व्हावेत, अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लग्नातील मान-अपमान तसेच होणारे खर्चही मोठ्या प्रमाणात वाचणार आहेत.
एरवी लग्न समारंभाच्या दिवशी गाजावाजाशिवाय वातावरणनिर्मिती होत नसल्याचा सूर असतो. मात्र, लॉकडाऊनच्या कालावधीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो साध्या पद्धतीचे विवाह सोहळे पार पडले आहेत. त्यामुळे लग्न लावणाऱ्या कुटुंबांची लाखो रुपयांची बचत झाली आहे. कोणतेही वाद्य, घोडा, मंडप नाही. हजारो लोकांच्या जेवणाचा खर्च, लग्नसमारंभातील गाजावाजा, ध्वनिप्रदूषणही नाही. एवढेच नव्हे तर रुसवे-फुगवे, मानापमानाचे प्रसंग नाही. शारीरिक, मानसिक, आर्थिक ताण नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लग्नात गर्दी होत नसल्याने वऱ्हाडी मंडळीची गैरसोयही टळत आहे.
मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सध्या सर्वत्र अशा पद्धतीने लग्न समारंभ पार पडत आहेत. यामध्ये वरपक्ष आणि वधुपक्षाकडचे लाखो रुपयांची बचत होत आहे. कोरोनाने जशी शारीरिक स्वच्छतेचे धडे दिले तसेच जुनाट सामाजिक प्रथांना अव्हेरून नवे बदल स्वीकारण्याची संधी दिली आहे.
आदर्श घ्यावाच
सध्या विवाहांना सुरुवात झाली असून, आता पुढे अशाच लग्नबाबत समाधान असू द्यावे, अशी अपेक्षा अनेक व्यक्ती व्यक्त करीत आहेत. साध्या पद्धतीने विवाह सोहळ्याची ही प्रथा अशीच चालू राहिली, तर शेतीवर पूर्णपणे अवलंबून असणारी सर्वसाधारण कुटुंबे यापुढे लग्नासाठी झालेल्या अवाजवी खर्चातून कर्जबाजारी होणार नाही.