शेगाव : दर गुरुवारी गजानन महाराज मंदिराजवळ रेल्वे थांबविण्यासाठी साखळी ओढून, रेल्वे रुळ ओलांडणार्या प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचार्यांनी गुरूवारी कारवाई केली. एकाच वेळी १00 पेक्षा जास्त प्रवाशांना अटक करुन, रेल्वे पोलिसांनी त्यांच्या विरुध्द कारवाई केली.शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून भक्त मोठय़ा प्रमाणात येतात. गुरूवारी भक्तांची गर्दी जास्त असते. रेल्वेने दर गुरूवारी नियमित शेगाव वारी करणार्या भक्तांची संख्याही थोडीथोडकी नाही. शेगावच्या रेल्वे स्टेशनवरून मंदिर थोडे लांब आहे. त्यामुळे नागपूर-मुंबई मार्गावरील रेल्वेगाड्या गजानन महाराज मंदिराजवळ थांबतील, अशा बेताने साखळी ओढून थांबविल्या जातात. गजानन भक्त त्यांच्या सोयीसाठी हा गैरप्रकार करीत असले तरी, त्याचा फायदा या परिसरातील इतर प्रवाशांनाही होते; मात्र साखळी ओढल्यानंतर मंदिराजवळ रेल्वे १0 मिनिटे त्याच ठिकाणी थांबते. शिवाय तीच गाडी पुन्हा शेगाव रेल्वे स्थानकावरही थांबते. या प्रकाराची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेत, या प्रकाराला आळा घालण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार गुरुवारी रेल्वे सुरक्षा बलाने कारवाईची तयारी केली होती. चारमोरी परिसरात नागपूर - भुसावळ पॅसेंजर प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे गेटजवळ थांबवताच, या गाडीतून उतरणार्या व रेल्वेचे नियम मोडणार्या १00 पेक्षा जास्त प्रवाशांना पोलिसांनी अटक केली. रेल्वे पोलिसांची ही कारवाई सायंकाळपर्यंंत सुरु च होती. अटक करण्यात आलेल्या प्रवाशांवर रेल्वे कायदा कलम १४७ नुसार कारवाई करण्यात आली.
साखळी ओढून रेल्वे थांबविणा-या १00 प्रवाशांना एकाच वेळी अटक
By admin | Published: September 19, 2014 12:46 AM