जलसंपदा विभागाचा श्रीगोंद्याला ठेंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:24 IST2021-08-28T04:24:40+5:302021-08-28T04:24:40+5:30
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन शेवटची घटिका मोजू लागले आहे. कर्जत तालुक्याला ...

जलसंपदा विभागाचा श्रीगोंद्याला ठेंगा
श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातील येडगाव धरणाने तळ गाठला आहे. त्यामुळे कुकडीचे आवर्तन शेवटची घटिका मोजू लागले आहे. कर्जत तालुक्याला कुकडीची संजीवनी मिळाली आहे, मात्र जलसंपदा विभागाने पाण्याची तरतूद न करता श्रीगोंदा तालुक्याला आवर्तनात ठेंगा दाखवला आहे. अशा परिस्थितीत येडगावचे आवर्तन सुरू ठेवावे म्हणून श्रीगोंद्यातील नेत्यांनी भेटीगाठी आणि पत्रकबाजी सुरू केली आहे, मात्र कुकडीचे पाणी न मिळाल्याने श्रीगोंद्यात संतापजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांनी गुरुवारी कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ यांची भेट घेऊन आवर्तनाबाबत चर्चा केली. त्यात धुमाळ यांनी पाऊस पडला तर आवर्तन, अन्यथा अवघड आहे, स्पष्ट सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार व जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे यांनी माणिकडोह धरणातून येडगाव धरणात एक टीएमसी पाणी सोडून आवर्तन चालू ठेवावे, अशी मागणी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली. जलसंपदामंत्र्यांनी मात्र अद्याप कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही.
येडगाव धरणातून ओव्हरफ्लोचे पाणी सोडले. ते कर्जत तालुक्यातील पिकांना दिले, मात्र श्रीगोंद्यात आवर्तन सुरू होताच येडगावमधील पाणी आटले. परिणामी, येडगावचे आवर्तन बंद झाल्यात जमा झाले आहे. पाऊस नसल्याने श्रीगोंद्यातील पिकांना कुकडीच्या आवर्तनाची मोठी गरज होती, पण पाणी न मिळाल्याने श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
प्रत्येक आवर्तनात श्रीगोंदा तालुक्यावर अन्याय होतो. दुसरीकडे नेतेमंडळी केवळ पत्रकबाजी करतात, अधिकाऱ्यांना भेटतात. मात्र यातून काहीच साध्य होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून चीड व्यक्त होत आहे.
--------------
...तर आम्हाला दहशतवादी व्हावे लागेल
गेल्या उन्हाळी हंगामात या सरकारने आणि अधिकाऱ्यांनी कुकडीच्या आवर्तनात श्रीगोंदा तालुक्यावर अन्याय केला. आताही परिस्थिती गंभीर असताना श्रीगोंद्याला पाणी दिले नाही. सरकारने असा दुजाभाव करणे बरोबर नाही. डिंबे-माणिकडोह जोड बोगद्याच्या प्रश्नात राज्य सरकार वेळकाढूपणा करीत आहे. किती वर्षे श्रीगोंद्याने अन्याय सहन करायचा. एक दिवस आम्हाला हक्काच्या पाण्यासाठी दहशतवादी भूमिका घ्यावी लागेल, अशी संतापजनक प्रतिक्रिया बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांनी दिली.
-----------
पाऊस आला तर आवर्तन!
डिंबे धरणातून येडगावमध्ये पाणी चालू आहे, पण माणिकडोह धरणातून येडगाव धरणात ॲाक्टोबरपर्यंत पाणी सोडता येणार नाही. पाऊस येईल या अपेक्षेने येडगावचे आवर्तन चालू ठेवले आणि पाऊस आला नाही तर येडगावच्या आवर्तनाची अडचण होईल. त्यामुळे पाऊस पडला तरच येडगावचे पाणी चालू ठेवता येईल.
- हेमंत धुमाळ, अधीक्षक अभियंता, कुकडी प्रकल्प