शेवगाव : अमरापूर (ता. शेवगाव) येथील सुसरे रस्ता, पिंपळगाव रस्ता व वरूर रस्ता येथील नागरिकांचा गेल्या ५ महिन्यांपासून विद्युत पुरवठा बंद आहे. हा विद्युत पुरवठा तत्काळ सुरू करावा, या मागणीचे निवेदन जनशक्तीचे अध्यक्ष ॲड. शिवाजी काकडे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी महावितरण उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता एस. एम. लोहारे यांना देण्यात आले आहे. वीज पुरवठा तत्काळ सुरू न झाल्यास संबंधित गावातील नागरिक गुरुवारी (दि.३०) घेराव घालून आंदोलन करतील, असा इशारा काकडे यांनी दिला.
यावेळी कॉ. राम पोटफोडे, मोहन मरकड, शिवाजी पोटफोडे, विनायक पोटफोडे, अनंता बोरुडे, बप्पासाहेब खैरे, आप्पासाहेब गरड, काकासाहेब घोंगडे, श्रीराम सुसे, अर्जुन सुसे, संतोष कळमकर, शिवाजी कोरडे, रंगनाथ सुसे, प्रशांत पुंड, उद्धव मुरदारे आदी उपस्थित होते.
अमरापूर येथील ग्रामस्थांना गेल्या पाच महिन्यापासून अक्षय प्रकाश योजनेची वीज मिळत नाही. यामध्ये येथील पोल्ट्री फार्म व्यावसायिकांनी लाखोंचे कर्ज काढून पोल्ट्री शेड उभारले. त्यामध्ये कोणी १५ तर कोणी २० हजार पक्षी टाकले आहेत. गेल्या पाच महिन्यांपासून वीज पुरवठा बंद असल्याने त्यांचे व्यवसाय अडचणीत आले आहेत. परिणामी, फार मोठे नुकसान होत आहे. विजेअभावी रात्री-बेरात्री अबालवृद्धांना अथवा महिलांना घराबाहेर पडता येत नाही. मुलांना अभ्यास करताना अडचणी येतात. वस्तीवर जवळपास ३० ते ३५ कुटुंब राहतात. या सर्वांची विजेअभावी मोठी गैरसोय होत आहे. आपल्या खात्याकडे संबंधित शेतकऱ्यांनी वारंवार भेटून वीजजोडणी संदर्भात विनंती केली; परंतु त्यांना नेहमीच उडवा-उडवीची उत्तरे देऊन त्यांना टाळण्यात आले. त्यामुळे सर्व शेतकरी व व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. या सर्व मुद्द्यावर तातडीने आपण २९ सप्टेंबरपर्यंत वीज पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा गुरुवारी (दि.३०) ग्रामस्थ घेराव घालतील. जोपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन संपणार नाही, असेही निवेदनात म्हटले आहे.
----
२३ अमरापूर
अमरापूरच्या ग्रामस्थांच्यावतीने ॲड. शिवाजी काकडे यांनी वीज जोडणीबाबतचे निवेदन महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.
230921\img-20210923-wa0024.jpg
तात्काळ वीज पुरवठा सुरु करावा या मागणीचे निवेदन देतांना शिवाजीराव काकडे व इतर ग्रामस्थ.