अहमदनगर : जिल्ह्यात रोज सरासरी दोन हजार जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. गुरुवारी तब्बल ३ हजार ९७ जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने आतापर्यंतच्या दैनंदिन रुग्णसंख्येचा नवा उच्चांक झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेनेही चिंता व्यक्त केली असून उपचार घेणाऱ्या सक्रिय रुग्णांची संख्या १६ हजार ६९४ झाली आहे. बरे होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण ८५ टक्के असून गुरुवारी १८८५ जणांना घरी सोडण्यात आले आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ८७१, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ८२९ आणि अँटिजन चाचणीत १३९७ रुग्ण बाधित आढळले. त्यामध्ये नगर शहर (६७५), राहाता (३५२), संगमनेर (२६७), पाथर्डी (१९५), कर्जत (१९०), कोपरगाव (१७७), नगर ग्रामीण (१६९), श्रीरामपूर ( १६५), अकोले (१४७), नेवासा (१३४), पारनेर (१३३), शेवगाव (११४), राहुरी (१०७), श्रीगोंदा (१०७), जामखेड (७९), भिंगार (४६), इतर जिल्हा (२७), मिलिटरी हॉस्पिटल (१०), इतर राज्य (३) येथील रुग्णांचा समावेश आहे.
-----
जिल्ह्याची कोरोना स्थिती
बरे झालेली रुग्णसंख्या : १,०८,१०६
उपचार सुरू असलेले रुग्ण : १६६९४
मृत्यू : १४०१
एकूण रुग्णसंख्या : १,२६,२०१
--------
दिवसभरात ३५ जणांचा मृत्यू
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी संपलेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्यास त्यांच्यावर नगर येथील अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. तेथे विद्युत दाहिनीची क्षमता दिवसाला २० जणांवरच अंत्यसंस्कार करण्याची असल्याने उर्वरित अंत्यसंस्कार लाकडावर केले जात आहेत.