पाऊस येऊ दे... दुष्काळ हटू दे...!

By Admin | Updated: July 30, 2014 00:46 IST2014-07-29T23:45:22+5:302014-07-30T00:46:52+5:30

अहमदनगर : ‘भरपूर पाऊस येऊ दे... दुष्काळ हटू दे.... ही भूमी सुजलाम सुफलाम होऊ दे.. देशातील सर्वांप्रती प्रेम, सद्भावना वाढीस लागू दे... जगात शांती नांदू दे आणि सर्वांचे कल्याण होवो’ अशी प्रार्थना

Let the rain come ... let loose the famine ...! | पाऊस येऊ दे... दुष्काळ हटू दे...!

पाऊस येऊ दे... दुष्काळ हटू दे...!

अहमदनगर : ‘भरपूर पाऊस येऊ दे... दुष्काळ हटू दे.... ही भूमी सुजलाम सुफलाम होऊ दे.. देशातील सर्वांप्रती प्रेम, सद्भावना वाढीस लागू दे... जगात शांती नांदू दे आणि सर्वांचे कल्याण होवो’ अशी प्रार्थना करीत शहराचे खतीब (प्रमुख)मौलाना सईद अहमद यांनी रमजान ईदचे नमाज पठण केले. त्यामागे हजारो मुस्लीम बांधवांनी नमाज अदा करीत अल्लाहकडे दुआ मागितली.
कोठला येथील ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम समाज बांधवांनी नमाज अदा केली. पांढराशुभ्र पोशाख आणि अत्तरांच्या सुवासाने मैदान दरवळले होते. सकाळी आठपासूनच मैदानाकडे जाणाऱ्यांनी रस्ते फुलले होते. औरंगाबाद रोडवर वाहनांच्या आणि माणसांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. एक-एक करीत मैदान हाऊसफुल्ल झाले. सुरूवातीला मौलाना सईद अहमद यांनी कुरआनचे अरब भाषेतून पठण केले. कुरआनमधील जीवन जगण्याची तत्वे पटवून दिली. लोकांच्या कल्याणासाठी जगा, सर्वांप्रती सद्भाव राखा, स्वत:च्या उन्नतीसोबत समाजाच्या उन्नतीला हातभार लावा. शोषित, पीडितांचा उद्धार करा. इस्लाम तत्त्वाप्रमाणे आचरण करून समृद्ध व्हा, असा संदेश दिला. एक तासभर त्यांचे प्रवचन सुरू होते, तर दुसरीकडे मैदानाकडे येणाऱ्यांची गर्दी होत होती. मैदानात गर्दी झाल्याने मैदानाच्या बाहेरील औरंगाबाद रोडवर शेकडो बांधव नमाज अदा करण्यासाठी बसले होते. सकाळी दहाच्या ठोक्याला नमाज पठण झाले. त्यांच्यामागोमाग हजारो बांधवांनी नमाज अदा करीत अल्लाहकडे दुआ मागितली.
मुख्य नमाज पठण झाल्यानंतर पश्चिम द्वाराकडून घरी जाणाऱ्या मुस्लीम बांधवांना शांतता समितीतर्फे गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आले. यावेळी महापौर संग्राम जगताप, पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय अधिकारी वामन कदम, तहसीलदार कैलास पवार, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष ब्रिजलाल सारडा, अ‍ॅड. शिवाजी कराळे, उबेद शेख, नगरसेवक अरिफ शेख, माजी उपमहापौर हाजी नजीर शेख, शांतता समितीच्या नलिनी गायकवाड आदींची उपस्थिती होती. व्यासपीठावर सर्व धर्मातील प्रमुख उपस्थित होते. त्यांनीही मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
(प्रतिनिधी)
परस्परांना आलिंगन
नमाज अदा झाल्यानंतर परस्परांना अलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. लहान मुलांना आशीर्वाद देण्यात आले. नमाजसाठी लहान मुलांपासून ज्येष्ठांपर्यंत गर्दी होती. अन्य धर्मीयांनीही शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती.
भिक्षेकऱ्यांची गर्दी
नमाज पठणानंतर ईदगाह मैदानाच्या बाहेर येत असताना भिक्षेकऱ्यांनी रस्ते अडवले होते. झोळ््या घेऊन ते भिक्षा मागत होते. काही मुस्लीम बांधवां मशिदीचे बांधकाम, धार्मिक कार्यासाठी झोळी घेऊन भिक्षा मागताना दिसत होते. नमाज पठण केल्यानंतर सर्वांनीच दिसेल त्या झोळीत दान टाकले. उत्पन्नाचा हिस्सा समाजासाठी अर्पित करण्याचा (जकात) हेतू असल्याचे यावेळी मुस्लीम बांधवांनी सांगितले.
वाहनांची गर्दीच गर्दी
नमाज अदा करण्यासाठी शहराच्या सर्व भागातून मुस्लीम बांधव आले होते. औरंगाबाद रोडच्या दोन्ही बाजूंनी दुचाकी,चारचाकी वाहनांची गर्दी झाली होती. या रस्त्यावरून जाणारी जड वाहनांची वाहतूक काहीकाळ बंद करण्यात आली होती. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढोकले यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली. वाहतूक सुरळीत होण्यासाठी तब्बल एक तास लागला.
रस्त्याच्या
दुतर्फा नमाज
ईदगाह मैदान हाऊसफुल्ल झाल्याने औरंगाबाद रोडच्या दोन्ही बाजूंना मुस्लीम बांधव नमाज पठणासाठी बसले होते. तेथेच बसून त्यांनी नमाज अदा केली. यामुळे एक तास या महामार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली होती. नमाज पठणानंतर हा रस्ता मोकळा झाला. सकाळी पाऊस असल्याने सर्वांनाच पठणासाठी येताना चटई, सतरंज्या आणाव्या लागल्या.

Web Title: Let the rain come ... let loose the famine ...!