-----------
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : अनेकांची चालण्याची सवयच बंद झाली आहे. अगदी भाजी किंवा दूध आणायचे असले तरी, अनेकजण वाहनावरूनच जातात. घरापासून रस्त्याचे अंतर चालण्यासारखे असले तरीही, वाहनांचाच वापर केला जातो. मुले तर वाहनाशिवाय घराबाहेरच पडत नसल्याचे चित्र आहे. वाहन चालविता येत असल्याने महिलांचे चालणेही कमी झाले आहे. अनेक कार्यालयांत कर्मचारी तासन् तास जागेवरच बसून असतात. त्यामुळे नको त्या वयात गुडघेदुखी, कंबरदुखी मागे लागली आहे.
पूर्वी बहुतांश कामे करण्यासाठी चालणे व्हायचे. भाजीपाला, दूध, दळण, किरकोळ कामांसाठी चालणे व्हायचे. रिक्षा, बसथांब्यापर्यंतही चालले जायचे. पण सध्या धकाधकीचे जीवन, प्रत्येक गोष्टीसाठी वेळ कमी असल्याचे कारण देत प्रत्येकजण आपल्याजवळील वाहन घेऊन धावत आहे. त्यामुळे चालणेच बंद झाले आहे. चालणे कमी झाल्याने तसेच वेळेअभावी अनेकांचा व्यायाम बंद झाल्याने गुडघेदुखी, कंबरदुखी असे आजार पाठीमागे लागले आहेत. त्यामुळे अशा आजारांनी तरुण वर्गही त्रस्त आहे.
---
या कारणांसाठीच होतेय चालणे...
ज्येष्ठ : व्यायाम म्हणून सकाळ आणि सायंकाळ
महिला : किराणा दुकानापर्यंत, रिक्षा मिळेपर्यंत
पुरुष : घरात किंवा कार्यालयात जाईपर्यंत. शतपावली
तरुण : मित्र-मैत्रिणींच्या घरापर्यंत
----------------
हे करून पाहा...
१) एक कि.मी. परिसरापर्यंत वाहनाचा वापर टाळा
२) कुठलेही काम करताना सहकाऱ्याची मदत कमी घ्या
३) घाई नसेल त्यावेळी लिफ्टचा वापर टाळा
-----------
...म्हणून हाडाचे आजार वाढले
अनेकांना घराबाहेर जाणे होत नसल्याने सूर्यप्रकाश मिळत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डी ची कमतरता भासते. कॅल्शिअम हाडात शोषणे थांबले की हाडाची दुखणी वाढतात. आजकाल ९५ टक्के लोकांमध्ये कॅल्शिअमच्या कमतरतेमुळे हाडांच्या दुखण्याचे प्रमाण वाढले आहे, असे येथील तज्ज्ञ डॉ. सुबोध देशमुख यांनी सांगितले. जवस, बदाम, अक्रोडसारख्या बियांमधून कॅल्शिअम, मिनरल्स मिळतात.
----------
ज्यांना चालणे शक्य नाही त्यांच्यासाठी...
ज्यांना चालणे शक्य नाही, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन-डी च्या गोळ्या घ्याव्यात. तसेच बसल्या जागेवर करण्यासारखे योग, प्राणायाम आणि घरगुती आसने आहेत, अशी आसने त्यांनी घरात बसून केली तरी यातून व्यायाम होऊ शकेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.
---------------