पैसा, बंगला, गाडी द्या अन्
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:14 IST2021-07-24T04:14:09+5:302021-07-24T04:14:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : मुलांच्या लग्नासाठी मुलीच भेटत नाहीत. आता मुलींनाच हुंडा द्यावा लागतोय, असे म्हटले जाते. काही ...

पैसा, बंगला, गाडी द्या अन्
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : मुलांच्या लग्नासाठी मुलीच भेटत नाहीत. आता मुलींनाच हुंडा द्यावा लागतोय, असे म्हटले जाते. काही प्रमाणात ही परिस्थिती खरी असली तरी पुरुषप्रधान संस्कृतीत रूढी-परंपरेने रुजलेली हुंडा देण्याची पद्धत समाजात आजही तग धरून आहे. मुलीच्या पित्याने ठरवलेला हुंडा दिला नाही, लग्नात मानपान दिला नाही, चांगल्या वस्तू दिल्या नाहीत आदी कारणांवरून सासरी विवाहितांचा छळ सुरूच आहे. गेल्या दीड वर्षात जिल्ह्यात सासरी झालेल्या छळाच्या संदर्भात ५३२ तक्रारी पाेलिसांकडे दाखल आहेत.
मुलीला नोकरीवाला अथवा चांगला श्रीमंत पती मिळावा, ती आयुष्यात सुखी व्हावी, असे प्रत्येक माता-पित्याचे स्वप्न असते. यासाठी त्यांची काहीही करण्याची तयारी असते. कर्ज काढून, शेती विकून माता-पिता मोठ्या थाटामाटात मुलींचे लग्न लावून देतात. मागेल तेवढा हुंडा दिला जातो. लग्नात इतर सर्व वस्तूही दिल्या जातात. एवढा सारा थाटमाट करूनही बहुतांशीवेळा मुलांच्या नातेवाइकांचे समाधन होत नाही. बंगला बांधण्यासाठी, कार घेण्यासाठी, व्यवसाय सुरू करण्यासाठी मुलीने तिच्या माहेरून पैसे आणावेत, अशी मागणी केली जाते. यासाठी सासरी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला जातो. शेवटी वैतागून काही मुली मरण जवळ करतात किंवा सासरच्या नातेवाइकांविरोधात पोलिसांत तक्रार देतात.
---
अशिक्षितांपासून उच्चशिक्षितांपर्यंत सारेच सारखे
हुंड्यासाठी सासरी विवाहितेच्या छळाच्या घटना ग्रामीणसह शहरी भागातही माेठ्या प्रमाणात घडत आहेत. मुलीचे सासरचे कुटुंब शिक्षित असो अथवा अशिक्षित मानसिकता सारखीच आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देणाऱ्या विवाहिता २० ते ५५ या वयोगटातील आहेत. त्यामुळे अगदी नातू झाला तरी सासरी छळाचा सामना करावा लागत आहे.
-------------------
मुलींचे माता-पिताही जबाबदार
ज्या घरात मुलगी आहे, त्याच घरातील मुलाचे लग्न करताना हुंडा घेतलेला असतो. त्यामुळे आपल्या मुलीचे लग्न करतानाही हुंडा द्यावाच लागणार हीच मानसिकता असते. त्यामुळे हुंडा देणे आणि घेणे हे कुणालाच चुकीचे वाटत नाही. मुलगा पैशावाला आहे म्हणून मुलींचे माता-पिताही तो मागेल त्या मागण्या पूर्ण करण्याचा अट्टहास करतात. ही मानसिकताही हुंडा प्रथेला जबाबदार आहे.
--------------
नवी पिढी बदलतेय
घराच्यांचा विरोध असूनही मुलींच्या नातेवाइकांकडून हुंडा न घेता साध्या पद्धतीने लग्न केले. काही दिवस माता-पिता नाराज झाले मात्र त्यांनी आता आम्हाला स्वीकारले आहे. सुरुवात आपल्यापासून केली तरच परिस्थिती बदलणार आहे.
- एक विवाहित तरुण
----------------------
२०२० मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -३३९
२०२१ मध्ये जिल्ह्यात कलम ४९८ अंतर्गत दाखल गुन्हे -१९३