राज्यमार्गाच्या बिकट अवस्थेमुळे वाहतूक करताना हाल होत असून दुरुस्तीची मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करूनही काहीच उपाययोजना करण्यात आलेली नाही. याकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. रस्त्यावर अगणित खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना तसेच गुजरातकडून येणाऱ्या साईभक्तांना मोठी कसरत करत जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. या रस्त्यामुळे अनेकांना मणक्याचे विकार जडले आहेत. जड वाहनांची नेहमीच ये - जा सुरू असल्याने डांबर उखडून खड्डे निर्माण होत आहेत. मात्र, निकृष्ट दर्जाचे रस्ते असल्याने रस्ते सतत उखडतात आणि खड्डे तयार होतात. त्यामुळे तारेवरची कसरत करावी लागत आहे.
बांधकाम विभागाने याकडे कायमच दुर्लक्ष केले. त्यामुळे या मार्गावरील गावातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी केली आहे. दहा दिवसांत कार्यवाही न झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा सरपंच नीळकंठ चांदगुडे यांनी दिला आहे.