संकटाच्या काळातही विकासकामांसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:27 IST2021-08-17T04:27:14+5:302021-08-17T04:27:14+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ...

संकटाच्या काळातही विकासकामांसाठी प्रयत्न
अहमदनगर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. संकटाच्या काळातही जिल्ह्यातील विकास कामांच्या अंमलबजावणीचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी राज्यस्तरावरूनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
स्वातंत्र्य दिनाच्या ७४ व्या वर्धापन दिनानिमित्त येथील पोलीस परेड मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते पार पडला. त्यानंतर त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा पोलीसप्रमुख मनोज पाटील, महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुश्रीफ म्हणाले, देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही अनेक आव्हानांचा सामना करत आधुनिक भारताची उभारणी करण्यासाठी स्वातंत्र्योत्तर काळात अनेकांचे योगदान राहिले. विविध क्षेत्रात आपल्या देशाने गगनभरारी घेतली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. अशा वेळी सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळणे, घराबाहेर पडताना मास्कचा वापर करणे, लक्षणे जाणवल्यास तात्काळ उपचार घेणे, अशा प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून आणि प्रत्येकाने योग्य ती काळजी घेत स्वत:चे आरोग्य जपावे, असे आवाहन त्यांनी केले.
सध्या चाचण्यांची संख्या प्रतिदिन १५ हजारांहून अधिक वाढविली आहे. एकूण २३ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोरोना उपाययोजनांच्या अनुषंगाने १०० कोटी रुपयांची कामे करण्यात आली असून ५० कोटी रुपयांची कामे प्रस्तावित असल्याचे मुश्रीफ यांनी नमूद केले.
--------------
६५ कोटींची नुकसान भरपाई
एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यासाठी ११ कोटी २९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेत कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, नियंत्रित शेती यातील लाभार्थींना अनुदानाचे वितरण आपण केले आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजना आणि प्रधानमंत्री पीक विमा योजनांतर्गत १० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ६५ कोटींहून अधिक नुकसान भरपाई देण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
------------------
शेतकरीही करू शकतात पीक नोंद
जिल्ह्यात ई-पीक पाहणी अभियानास सुरुवात होत आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील पिकांची नोंद आता ॲपद्वारे करता येणार आहे. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने तलाठ्यांमार्फत पीकपेरा नोंद केली जात होती. आता शेतकरी स्वत: ती नोंद करू शकतील. डिजिटल कृषी क्रांतीपर्वाकडे आपण वाटचाल करत असल्याचे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.
-----------
वलटे, शेंडकर यांचा ताम्रपटाने गौरव
पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते, जम्मू-काश्मीर सीमेलगत कलाल सेक्टरमध्ये सेवा बजावताना अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या नायब सुभेदार सुनील वलटे यांच्या वीरपत्नी मंगला वलटे यांना तसेच मराठा इन्फ्रन्ट्री बटालियनमध्ये सेवेत असताना सेवा बजावताना गंभीर जखमी झालेले नायब सुभेदार रावसाहेब शेंडकर यांना ताम्रपट देऊन गौरविण्यात आले.
उत्कृष्ट काम केल्याबद्दल उपजिल्हाधिकारी पल्लवी निर्मळ, कोरोना योद्धा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. वीरेंद्र बडदे आणि आदर्श तलाठी पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रशांत हासे यांना मुश्रीफ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
--------------
फोटो -