करंजी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावर बसताच राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली. बहुतांश शेतकऱ्यांना दोन लाख रूपयांपर्यंत कर्ज माफीही मिळाली. मात्र काेरोनाने यासह इतर विकासकामांना खीळ बसली. कोरोना संकटानंतर उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिली.
पाथर्डी तालुक्यातील करंजी येथे शिवसंपर्क अभियानाचा प्रारंभ शनिवारी सकाळी झाला. यावेळी ते बाेलत होते.
गडाख म्हणाले, कोरोनाच्या संकटात शिवसैनिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता गरजूंना मदत केली. मिरी-करंजी जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. या गटातील स्व. मोहनराव पालवे व स्व. अनिल कराळे यांचे कोरोनाने निधन झाले. त्यामुळे या भागात शिवसेनेत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम करू, अशी ग्वाही ही गडाख यांनी दिली.
गडाख यांचा करंजी ग्रामस्थांच्या वतीने शरद अकोलकर, अशोक अकोलकर, आबासाहेब अकोलकर आदींनी सन्मान केला. यावेळी शिवसेनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, उषाताई कराळे, उद्धव दुसुंग, भरत वांढेकर, सुरेश वाघ, रफिक शेख, शरद अकोलकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन व नियोजन रफिक शेख यांनी केले.
गडाख यांनी मंत्री झाल्यानंतर प्रथमच पाथर्डी तालुक्यास भेट दिली. मिरी, भोसे, गितेवाडी, घाटशिरस, देवराई, मोहोज सह अनेक गावातील ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला.