अहमदनगर : सावेडी भागातील प्रोफेसर चौकातील चौपाटी सायंकाळनंतर सुरू ठेवण्यात आता नियमांचे अडथळे आले आहेत. महापालिका आणि पोलिसांनी सायंकाळनंतर खाद्यपदार्थ्यांची विक्री करण्यास मनाई केल्याने आता आमच्यावरच उपासमारीची वेळ येईल. त्यामुळे सायंकाळनंतर हातगाडे सुरू ठेवण्याची मागणी प्रोफेसर चौकातील खाद्यपदार्थ्यांच्या विक्रेत्यांनी प्रशासनाकडे केली आहे. तसेच सर्वच विक्रेत्यांनी ‘लोकमत’कडेही कैफीयत मांडली. नगर शहरासह जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ४ अशी दुकानांची वेळ आहे. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी आहे. तसेच हॉटेलांना पार्सल सुविधा देण्याची परवानगी आहे. मात्र हातगाडेचालक रस्त्यावर असल्याने त्यांना मात्र व्यवसाय करू दिला जात नाही. दिवसभर इतर दुकाने सुरू असतात. त्यामुळे या दुकानांसमोर हातगाडे लावू दिली जात नाहीत. सायंकाळी सहानंतर आमचे ग्राहक सुरू असतात. सर्व खाद्यपदार्थ्यांचे विक्रेते कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून सायंकाळनंतर फक्त पार्सल सुविधा देण्यास प्रशासनाने परवानगी द्यावी. कोणालाही जागेवर खाण्यास आम्हीच परवानगी देत नाहीत. तसेच नियमांचे पालन व्हावे, अंतर राखले जावे, यासाठी नियमांचे पालन केले जात आहे, असे विक्रेत्यांनी निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर संदीप जाधव, आशुतोष बांगर, गणेश तुरे, बबलू भिंगारे, गणेश साळी, राजू पवार, नीलेश मिसाळ, दिनेश तेली, राहुल अपरे, सोमनाथ मोकर, हरी बालटे, शुभम पंगुडवाले, अजमल अन्सारी, शुभम गारडे, किशोर गारडे, बाळू मराठे, अविनाश घाडगे, देवीदास लोखंडे, रोहन थापा, अजय तकडा आदींच्या सह्या आहेत.
--
७० ते ८८ जणांचा रोजगार बुडणार
प्रशासनाने खाद्यपदार्थ विक्री करण्यास, तसेच पार्सल सुविधा देण्याची परवानगी दिली नाही तर या व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या ७० ते ८० जणांची उपासमार होईल. सध्या केवळ २५ टक्केच व्यवसाय होतो. त्यात सायंकाळनंतर पार्सल सेवा देण्यास परवानगी दिली नाही तर आता आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, अशी कैफीयत संदीप जाधव यांनी ‘लोकमत’कडे मांडली.