कर्जत (जि. अहमदनगर) : राशीन (ता. कर्जत) येथील जगदंबा देवीच्या नवरात्रोत्सवाला यंदा प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी चौदा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन तहसीलदार नानासाहेब आगळेे यांच्याकडे शुक्रवारी केली. आता प्रशासन काय निर्णय घेते, याकडे भाविकांचे लक्ष लागले आहे.
पुढील महिन्यात नवरात्रोत्सव आहे. घटस्थापनेला हा उत्सव सुरू होतो. कोजागरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव चालतो. श्री जगदंबादेवी नवरात्र यात्रा उत्सवाची शेकडो वर्षांची परंपरा आहे. यंदा ७ ऑक्टोबर ते १९ ऑक्टोबर या काळात नवरात्र यात्रा उत्सव येत आहे. गेल्यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उत्सव साजरा केला नव्हता. यावर्षी कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. सर्व व्यवहार सुरळीत झाले आहेत. यावर्षी तरी नवरात्रोत्सव व्हावा, अशी लोकभावना आहे, असे म्हणत राशीन व परिसरातील चौदा ग्रामपंचायतींनी ठराव घेऊन नवरात्र यात्रा उत्सवाला परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. याबाबतची मागणी तहसीलदार नानासाहेब आगळेे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राशीन येथील व्यापारी संघटना, काँग्रेस आय, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष यांनी देखील प्रशासनाला निवेदन देऊन नवरात्रोत्सवास परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा केला जाईल, अशी ग्वाही देण्यात आली आहे.
---
या ग्रामपंचायतींनी केले ठराव...
राशीन, चिलवडी, देशमुखवाडी, सोनाळवाडी, तोरकडवाडी, काळेवाडी, परिटवाडी, करपडी, आखोणी, शिंपोरा, बारडगाव सुद्रिक, बारडगाव दगडी, बेनवडी, करमणवाडी.
.