31 मार्चपूर्वी उरकून घ्या 'ही' पाच महत्त्वाची कामे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 11:12 AM2024-03-25T11:12:20+5:302024-03-25T11:23:31+5:30

नव्या वर्षात प्रवेश करण्याआधी काही कामे या मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुम्हाला नाहक त्रास होऊ शकतो तसेच इतरही अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

नवी दिल्ली : येत्या ३१ मार्च रोजी चालू वित्त वर्ष संपेल. त्यानंतर सर्वजण नव्या आर्थिक वर्षात प्रवेश करतील. परंतु नव्या वर्षात प्रवेश करण्याआधी काही कामे या मुदतीत पूर्ण करणे गरजेचे आहे. तसे न केल्यास तुम्हाला नाहक त्रास होऊ शकतो तसेच इतरही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. टीडीएस फायलिंग आणि जीएसटी समाधान योजनेसाठी अर्ज करणे याचा त्यात समावेश आहे.

१.५ कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या व्यावसायिकांसाठी वित्त वर्ष २०२४-२५ करिता जीएसटी कंपोजिशन स्कीम म्हणजेच जीएसटी समाधान योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च आहे. यासाठी व्यावसायिकांनी सीएमपी-०२ अर्ज भरणे आवश्यक आहे.

३१ मार्चपूर्वी फास्टॅग केवायसी अद्ययावत न केल्यास १ एप्रिल २०२४ पासून तुमचे फास्टॅग खाते अवैध होईल. नॅशनल इलेक्ट्रॉनिक टोल कलेक्शनच्या वेबसाइटवर अथवा इंडियन हायवेज मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडच्या पोर्टलवर केवायसी पूर्तता करता येईल.

वित्त वर्ष २०२३-२४ साठी तुम्ही जुन्या आयकर योजनेत आयटीआर दाखल करणार असाल, तर कर सवलतीचा लाभ मिळविण्यासाठी ३१ मार्चपूर्वी आवश्यक गुंतवणूक करा. याद्वारे तुम्हाला १.५० लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सवलत मिळू शकते.

सार्वजनिक भविष्य निधी व सुकन्या समृद्धीसह अन्य योजनांत गुंतवणूक असेल तर ३१ मार्चपर्यंत किमान गुंतवणूक अटीची पूर्तता करावी लागेल. पीपीएफमध्ये किमान ५००, तर सुकन्या योजनेत किमान २५० रुपये गुंतवणे आवश्यक आहे. हे न केल्यास तुम्हाला दंड लागू शकतो.

जानेवारी २०२४ साठी वेगवेगळ्या कलमाधारे घेतलेल्या कर सवलतीसाठी मार्चमध्ये टीडीएस फायलिंग सर्टिफिकेट दाखवणे आवश्यक आहे. यात ३० मार्चपूर्वी चालान स्टेटमेंट फाइल करावे लागेल.