वाघापूर चौकात युवकाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 06:00 AM2019-12-11T06:00:00+5:302019-12-11T06:00:09+5:30
दोघेही नेहमीप्रमाणे वाघापूर चौकात चहाच्या टपरीवर उभे होते. तितक्यात आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी काहीही बोलण्याच्या अगोदर थेट हातातील चाकूंनी या दोघांना घेरून सपासप वार करणे सुरू केले. विनय राठोड याच्या वर्मी घाव लागल्याने तो जागीच कोसळला. तर आकाश वानखडे कसाबसा बाहेर पडून काही अंतरावर कोसळला.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील वाघापूर चौकात दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता अतिशय वर्दळीच्या वेळेस घडल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
विनय राठोड (२३) रा. शुभम कॉलनी असे मृताचे नाव आहे. तर आकाश वानखडे (२२) रा. नेताजी नगर हा गंभीर जखमी झाला आहे. हे दोघेही नेहमीप्रमाणे वाघापूर चौकात चहाच्या टपरीवर उभे होते. तितक्यात आठ ते दहा जणांचे टोळके तेथे आले. त्यांनी काहीही बोलण्याच्या अगोदर थेट हातातील चाकूंनी या दोघांना घेरून सपासप वार करणे सुरू केले. विनय राठोड याच्या वर्मी घाव लागल्याने तो जागीच कोसळला. तर आकाश वानखडे कसाबसा बाहेर पडून काही अंतरावर कोसळला. वाऱ्याच्या वेगाने आलेले सशस्त्र टोळके हल्ला करताच तितक्याच वेगाने निघून गेले. क्षणार्धात काय घडतेय याचा अंदाज तेथे उपस्थितांनाही आला नाही. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले दोन युवक दिसल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. त्या दोघांनाही काहींनी तातडीने शासकीय रुग्णालयात हलविले. विनय राठोड याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. आकाश वानखडे मृत्यूशी झुंज देत आहे.
कधी काळच्या खबऱ्यावरच संशय
प्रथमदर्शनी मोबाईलच्या पैशावरून हत्या झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. कधीकाळी पोलिसांचा खबऱ्या असलेल्या वीरूवर संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांचे पाठबळ मिळाल्याने वीरूने गुन्हेगारी जगतात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने परिसरातील स्पर्धक विशिष्ट पद्धतीने संपविले होते.