वणी बस आगाराला स्वच्छतेचा विटाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 06:00 AM2019-10-20T06:00:00+5:302019-10-20T06:00:11+5:30
या आगाराने २०१८ मध्ये ८९ लाख ७५ हजार ४६७ रूपये दिले होते, तर २०१९ मध्ये आतापर्यंत ४७ लाख ४६ हजार ३३० रूपये उत्पन्न दिले आहेत. या आगारात ५० पेक्षा अधिक बसेस असून १०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आगार परिसरात विश्रामगृह बांधले आहे. मात्र तेथे प्रचंड असुविधा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : देशभरात स्वच्छ भारतचा नारा दिला जात असताना दुसरीकडे वणी आगाराने मात्र स्वच्छतेच्या विषयात विटाळ पाळला आहे. आगारात कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाची अवस्था बकाल झाली असून त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आरोग्यच धोक्यात आले आहे. विश्रामगृहदेखील दुर्लक्षित असून या परिसरात झुडूपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.
सर्वाधिक उत्पन्न देणारे आगार म्हणून वणी आगाराची ओळख आहे. या आगाराने २०१८ मध्ये ८९ लाख ७५ हजार ४६७ रूपये दिले होते, तर २०१९ मध्ये आतापर्यंत ४७ लाख ४६ हजार ३३० रूपये उत्पन्न दिले आहेत. या आगारात ५० पेक्षा अधिक बसेस असून १०० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आगार परिसरात विश्रामगृह बांधले आहे. मात्र तेथे प्रचंड असुविधा आहे. या विश्रामगृहात मुक्कामाने थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. झोपण्यासाठीदेखील आवश्यक ती व्यवस्था याठिकाणी नाही. उन्हाळ्यात तर येथे कुलर किंवा थंड पाणीदेखील मिळत नाही. सन २००० मध्ये या विश्रामगृहाला लागूनच प्रसाधनगृह बांधण्यात आले. मात्र प्रसाधनगृहाची प्रचंड तुटफूट झाली असून त्यामुळे याठिकाणी कायम घाणीचे साम्राज्य असते. प्रसाधनगृहात जाणाºया कर्मचाºयांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो.
आगार व्यवस्थापक कार्यालयासमोरदेखील प्रसाधनगृह असून त्याची अवस्थादेखील बिकट झाली आहे. प्रसाधनगृह वापरण्यालायक नसल्याने कर्मचाऱ्यांना उघड्यावरच नैसर्गीक विधी उरकावा लागत आहे. विशेष म्हणजे याच आगार परिसरातून केंद्र सरकारच्या स्वच्छता विषयक योजनेचा अनेकदा गवगवा केला जातो. परंतु खुद्द वणी आगाराच घाणीच्या विळख्यात सापडला आहे. आगार परिसर स्वच्छ राहावा, यासाठी एका कंपनीला कंत्राट दिले असून त्यापोटी या कंपनीला एस.टी. महामंडळाकडून दरमहा लाखो रूपये अदा केले जातात.
वणी आगारात स्वच्छता ठेवण्यासाठी पाच ते सहा कर्मचारी नियुक्त आहेत. परंतु स्वच्छतेची समस्या मात्र दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. प्रसाधनृहात प्रचंड तुटफूट झाल्याने घाण तुंबत आहे. त्यामुळे कितीही स्वच्छता केली तरी परिस्थिती ‘जैसे थे’ राहते, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. एकंदर गंभीर परिस्थिती असतानाही या स्वच्छतागृहांची दुरूस्ती करण्यासाठी एस.टी. महामंडळाकडून कोणतेही पाऊल उचलले जात नाही. त्यामुळे वणी आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
कर्मचारी संघटनेची समस्येकडे डोळेझाक
कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कर्मचारी संघटना कार्यरत आहे. मात्र वणी आगारातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या प्रसाधनगृह व विश्रामगृहाची दुरावस्थेकडे कर्मचारी संघटनेचेदेखील डोळेझाक होत असल्याचा आरोप केला जात आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आता संघटनेनेच पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.