स्वगावी परतण्यासाठी ३५ कुटुंबांची नागरी सुविधा केंद्राकडे धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:27+5:30
या काळात ‘आहे त्याच ठिकाणी थांबण्या’च्या सूचना आहेत. संबंधितांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. याकरिता स्वयंसेवी संघटनांची मदत घेतली जाणार आहे. काही व्यक्ती या अनुषंगाने पुढे आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला सोडायचे झाल्यास आरोग्य, महसूल आणि पोलीस यंत्रणेकडून संपूर्ण अहवाल घेणे आवश्यक आहे. या टिमचे नेतृत्व तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाची धास्ती पसरलेली असताना परजिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांनी स्वगावी येण्यासाठी धडपड सुरू केली आहे. तर कामानिमित्त जिल्ह्यात आलेले काही नागरिक परजिल्ह्यातील आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्रदेशभरात लॉकडाऊन असल्याने या नागरिकांची अडचण झाली आहे. स्वगावी जाण्यासाठी अशा ३५ कुटुंबांचे अर्ज नागरी सुविधा केंद्राकडे आले असले तरी तूर्त त्यांना ‘आहे तिथेच थांबा’ अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
मात्र अशा नागरिकांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. त्यांच्या भोजनाची आणि निवासाची व्यवस्था प्रशासन करणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ललित वऱ्हाडे यांनी स्पष्ट केले.
मुंबई, चंद्रपूर, अहमदाबाद, सुरत, नागपूर, भुसावळ, छत्तीसगड, बडनेरा आणि जिल्ह्यातील काही तालुक्यांतून ३५ अर्ज नागरी सुविधा केंद्राकडे आले आहेत. या ३५ कुटुंबांना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जायचे आहे. त्यांना सध्याच इतर ठिकाणी जाता येणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट के ले. अत्यंत आवश्यक अशा आरोग्यसेवेसाठीच एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नागरिकांना पाठविल्या जाणार आहे. मात्र सर्वांना पाठविल्या जाणार नसल्याचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या काळात ‘आहे त्याच ठिकाणी थांबण्या’च्या सूचना आहेत. संबंधितांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहेत. याकरिता स्वयंसेवी संघटनांची मदत घेतली जाणार आहे. काही व्यक्ती या अनुषंगाने पुढे आल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला सोडायचे झाल्यास आरोग्य, महसूल आणि पोलीस यंत्रणेकडून संपूर्ण अहवाल घेणे आवश्यक आहे. या टिमचे नेतृत्व तहसीलदार डॉ. संतोष डोईफोडे करीत आहेत. नायब तहसीलदार अजय गौरकार, नंदकुमार बुटे, श्याम मॅडमवार, गजानन टाके, धिरज डाखरे, गोपाळ गायकवाड, रवींद्र मानकर, मिलिंद बोरकर, प्रमोद गुल्हाने, नितेश वाढई ही टिम नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहे.
६९ व्यक्तींवर कारवाई
जिल्ह्यात संचारबंदी, जमावबंदी लागू आहे. शुक्रवारी १८८ आणि १४४ या कलमांचे उल्लंघन करणाऱ्या ६९ व्यक्तींवर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. नियम मोडणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाने दिले आहेत.