विद्यार्थ्यांना पडला मैदानी खेळांचा विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:25+5:30
मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते पूर्वी पासूनच आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणाने व्यायाम तसेच मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे आपले मन आणि तन अॅक्टिव्ह राहते, असे जुने जाणते लोक सांगतात. मात्र आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि सगळे विसरून जाऊन विद्यार्थी व तुरण केवळ ऑनलाईन राहण्यावर जोर देत आहे.
उदय पुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
ढाणकी : आजचे युग हे संगणक तसेच मोबाईल युग म्हणून ओळखले जाते. या डिजिटल युगात सगळेच अपल्याला पटकन आणि जागेवर मिळत असल्याने मैदानी खेळांचा विद्यार्थी तसेच तरुणांना विसर पडल्याचे चित्र दिसत आहे.
मैदानी खेळ आणि विद्यार्थी यांचे नाते पूर्वी पासूनच आहे. प्रत्येक विद्यार्थी आणि तरुणाने व्यायाम तसेच मैदानी खेळ खेळले पाहिजे. त्यामुळे आपले मन आणि तन अॅक्टिव्ह राहते, असे जुने जाणते लोक सांगतात. मात्र आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि सगळे विसरून जाऊन विद्यार्थी व तुरण केवळ ऑनलाईन राहण्यावर जोर देत आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात खेळण्यासाठी मैदाने उपलब्ध होती. त्यामुळे खेळण्यासाठी जागा शोधण्याची गरज नव्हती. मात्र आता तशी स्थिती राहिली नाही. सर्वत्र सिमेंटचे जंगल उभे झाले आहे. या युगात मैदानासाठी जागाच राहिली नाही. त्यामुळे खेळायचे कोठे, हा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रत्येक जण आता मोबाईलवेडा झाला आहे. मात्र मोबाईलला चिकटलेल्या पिढीला त्या पासून दूर करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भविष्यात सहन करावे लागण्याची शक्यता आहे. जादा प्रमाणात मोबाईल तसेच संगणकाचा वापर केल्याने मान, डोळे, पाठीचा कण्यावर परिणाम होतो, असे तज्ज्ञ सांगतात.
मानसिक आरोग्यावर परिणाम
ऑनलाईन खेळांमुळे मानसिक आरोग्यसुद्धा ढासळण्याची शक्यता असते. त्यामुळे गरज असेल तेव्हाच मोबाईल वापरून विद्यार्थी व तरुणांनी पुन्हा मैदानी खेळाकडे अधिक लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. अन्यथा नवी पिढी पारंपरिक खेळ विसणार आहे.