सोयाबीनची आवक वाढल्याने बाजार समित्या ‘हाऊसफुल्ल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:00 AM2019-11-15T06:00:00+5:302019-11-15T06:00:11+5:30
शासनाने सोयाबीनचे हमीकेंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. हंगाम संपल्यानंतरही हमीकेंद्र उघडले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी हमीकेंद्राची प्रतीक्षा न करता आपला शेतमाल खुल्या बाजारात नेण्यास प्रारंभ केला आहे. सोयाबीनच्या नुकसानीमुळे खुल्या बाजारात दरात सुधारणा होत आहे. २८०० रुपयांपासून ३७०० रूपये क्विंटलपर्यंत सोयाबीनची खरेदी केली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य शासनाने सोयाबीनला ३७१० रूपये क्विंटलचा हमीदर जाहीर केला आहे. तरी हमीकेंद्र अजूनही सुरू केले नाही. याच सुमारास खुल्या बाजारात सोयाबीनचे दर मात्र सुधारण्यास प्रारंभ झाला आहे. यामुळे बाजार समित्या हाऊसफुल्ल झाल्या आहे. शेतकऱ्यांना अक्षरश: तेथेच मुक्काम ठोकावा लागत आहे.
शासनाने सोयाबीनचे हमीकेंद्र सुरू करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू केली आहे. हंगाम संपल्यानंतरही हमीकेंद्र उघडले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी हमीकेंद्राची प्रतीक्षा न करता आपला शेतमाल खुल्या बाजारात नेण्यास प्रारंभ केला आहे. सोयाबीनच्या नुकसानीमुळे खुल्या बाजारात दरात सुधारणा होत आहे. २८०० रुपयांपासून ३७०० रूपये क्विंटलपर्यंत सोयाबीनची खरेदी केली जात आहे. लगतच्या हिंगणघाट आणि कारंजा बाजारपेठेत हे दर ३७४० रूपये क्विंटलपर्यंत पोहचले आहे. हे दर हमीदरापेक्षा ३० रूपयांनी अधिक आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपला मोर्चा बाजार समितीकडे वळविला आहे. यातून बाजार समित्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. ऑनलाईन नोंदणी मात्र थांबली आहे. मार्केटिंग फेडरेशनला आतापर्यंत केवळ १२३ नोंदणी आल्या आहेत. यावरून शेतकऱ्यांनी हमीकेंद्राकडे पाठ फिरविल्याचेच स्पष्ट होत आहे.
खुल्या बाजारातील दरात सुधारणा
गतवर्षी शेतकऱ्यांनी हमीकेंद्राकडे सोयाबीन आणले. त्याचवेळी खुल्या बाजारात सोयाबीनचे दर चढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन परत द्या, अशी मागणी मार्केटिंग फेडरेशनला केली होती. यावर्षी हमी केंद्रच उघडले नाही. खुल्या बाजारातील भावही हमीदराच्या बरोबरीत पोहचले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी यावर्षी हमी केंद्रात नोंदणी केली तरी सोयाबीन पाठविले नाही. खुल्या बाजारातील दरात अशीच सुधारणा होत राहिल्यास पुढील काळात हमी केंद्र उघडले तरी सोयाबीन जाण्याची शक्यता कमी आहे.