कोरोनाला घाबरू नका, पण खबरदारी जरूर बाळगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:35+5:30
वातावरणातील सततच्या बदलाने सर्दी पडसा, खोकला हे आजार होतात. अशीच लक्षणे कोरोनातही दिसतात. अशावेळी हा रूग्ण सर्दी पडशाचा की कोरोनाचा, हे तपासण्यासाठी रूग्णाची ‘हिस्ट्री’ जाणून घेतली जाते. तो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, तो बाहेर देशात गेला होता काय, हे पाहिले जाते. त्यानंतर उपचार केला जातो.
कोरोनाशी दोन हात करण्यासाठी जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा पूर्णत: सज्ज आहे. कोणीही घाबरू नये.- डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा शल्यचिकित्सक
रुपेश उत्तरवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोनाच्या दहशतीने जिल्ह्यात वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्येक जण सर्दी, खोकला आणि शिंका येणाऱ्या व्यक्तीकडे संशयाच्या नजरेने पाहात आहे. मुळात कोरोना आणि सर्वसामान्य आजार यात फरक आहे. घाबरण्याचे कारण नाही. मात्र खबरदारी घ्यावीच लागणार आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे लागणार आहे. स्वच्छता पाळावी लागणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्याशी साधलेला संवाद...
सर्दी-खोकल्याचे रूग्ण आणि कोरोनाचे रूग्ण यात काय फरक आहे?
वातावरणातील सततच्या बदलाने सर्दी पडसा, खोकला हे आजार होतात. अशीच लक्षणे कोरोनातही दिसतात. अशावेळी हा रूग्ण सर्दी पडशाचा की कोरोनाचा, हे तपासण्यासाठी रूग्णाची ‘हिस्ट्री’ जाणून घेतली जाते. तो बाहेर देशातून आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला होता का, तो बाहेर देशात गेला होता काय, हे पाहिले जाते. त्यानंतर उपचार केला जातो. कोरोनाचा विषाणू भारतात निर्माण झालेला नाही. या आजारात सतत ताप राहतो. खोकला थांबत नाही. इतरही काही लक्षणे असतात. त्याकरिता तीन चाचण्या घेतल्या जातात. तीन चाचण्या ‘निगेटीव्ह’ आल्यावरच रूग्णाला सुटी दिली जाते.
मास्क बांधणे आवश्यक आहे काय?
मुळात मास्कची काहीच सध्याच गरज नाही. उलट अधिक वेळ मास्क राहिला तर त्यावरूनही जंतू पसरू शकतात. त्यापेक्षा स्वच्छ रूमाल वापरला तरी चालेल. तो दररोज स्वच्छ धुतलेला असावा. स्वच्छ रूमाल सुरक्षित आहे.
हॅन्डवॉश गरजेचे आहे काय?
कोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता गरजेची आहे. यामध्ये स्वत:ची स्वच्छता, परिसर स्वच्छता करणे आणि वारंवार हात धुतले पाहिजे. स्वच्छ पाण्याने, साबणाने धुतले तरी चालतील. भाज्या धुऊन आणि पूर्ण शिजवूनच खाव्या. आपली स्वच्छता ही विषाणू पसरण्यापासून पायबंद घालण्यास मदत करणारी ठरते. त्यामुळे प्रत्येकाने खबरदारी बाळगली पाहिजे.
६० वर्षांवरील वृद्धांना जपण्याची आवश्यकता
कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील सर्व कर्मचारी, आरोग्य विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, नगरपरिषद अशी सर्वच यंत्रणा अलर्ट आहे. ती युद्धपातळीवर काम करीत आहे. प्रत्येक ठिकाणी जनजागृतीचे काम सुरू आहे. आरोग्य यंत्रणेच्या अहवालानुसार कोरोना रूग्णात ६० वर्षावरील नागरिकांची संख्या जास्त आहे. ० ते ९ वर्षे वयोगटात अशा रूग्णांची संख्या नगण्य आहे. २० वर्षापेक्षा अधिक वय असणाºया रूग्णांची संख्या केवळ २ टक्के आहे.