कोरोनापायी पोलिसांचा दिवस जातो रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:16+5:30
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्वत्र कलम १४४ लागू केली आहे. या आणीबाणीच्या प्रसंगात उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये काम केले जात आहे. शहरात १७ ते १८ पॉर्इंट असून पोलीस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड यांच्यासोबत वाहतूक शिपाईही ड्युटीवर राहत आहे. ५० कर्मचाऱ्यांची पॉर्इंट ड्युटी लावली आहे. येथे बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करून योग्य कारण असल्यास त्यांना मदत केली जाते. तर उणाडक्या करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्गाचे संकट संपूर्ण देशावर आहे. या लढ्यात नागरिकांच्या सहकार्याची मोठी गरज आहे. त्यांच्या मदतीनेच ही लढाई जिंकता येणार आहे. वाहतूक पोलीस रस्त्यावर राहून गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. शिवाय जनजागृती केली जात आहे, अशी माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी सतीश चवरे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना दिली.
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन कामकाज ?
वाहतूक शाखेत ६८ कर्मचारी कार्यरत आहे. प्रत्येकाला स्वत:च्या सुरक्षिततेची खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी मास्क, सॅनिटायझर व आवश्यक साधने पुरविली आहे. याचा वापर करून त्यांच्या निर्देशानुसार कामकाज सुरू आहे.
या आणीबाणीच्या प्रसंगात कामाचे नियोजन कोणत्या प्रकारे ?
जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी सर्वत्र कलम १४४ लागू केली आहे. या आणीबाणीच्या प्रसंगात उपलब्ध कर्मचाऱ्यांमध्ये काम केले जात आहे. शहरात १७ ते १८ पॉर्इंट असून पोलीस ठाण्याचे कर्मचारी, होमगार्ड यांच्यासोबत वाहतूक शिपाईही ड्युटीवर राहत आहे. ५० कर्मचाऱ्यांची पॉर्इंट ड्युटी लावली आहे. येथे बाहेर पडणाऱ्या प्रत्येकाची चौकशी करून योग्य कारण असल्यास त्यांना मदत केली जाते. तर उणाडक्या करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे.
सहा दिवसात किती जणांवर कारवाई झाली ?
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या १ हजार ३१२ व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून दोन लाख ७० हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. संचारबंदी आदेश असतानाही विनाकारण गावात फेरफटका मारणाऱ्यांविरुद्ध आता आणखी कठोर कारवाई प्रस्तावित केली जाणार आहे. प्रशासनाच्या आवाहनाला सहकार्य करून घरात थांबावे.
घरी गेल्यानंतरही दक्ष राहण्याची सूचना
कर्तव्यावरून घरी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याची सूचना केली आहे. शक्यतोवर ड्युटीवरून घरी गेल्यानंतर थेट घरात न जाता अंगावरील गणवेश उतरवून आंघोळ करावी, रोज धुतलेला गणवेश वापरावा, असे निर्देश आहे. काही त्रास जाणवल्यास आरोग्य तपासणी करण्यास सांगितले आहे. या संकटाच्या घडीला वाहतूक पोलीस खंबीरपणे समोर जाणार आहे. प्रत्येक प्रसंगासाठी आम्ही सज्ज असल्याचे ते म्हणाले.
वाहतूक कर्मचारी हा पूर्णवेळ रस्त्यावरच असतो. विषाणू संसर्गाचा धोका त्यांनाही तुलनेने अधिक आहे. मात्र कर्तव्य बजावताना स्वत:ची सुरक्षा याबाबत काटेकोर राहणे आवश्यक आहे. शिपायांनी एक मीटर पेक्षा जास्त अंतर ठेऊनच तपासणी करावी, शक्यतोवर कागदपत्रे हातात घेऊ नये असे निर्देश देण्यात आले आहे.