कोरोना व्हायरसची दहशत ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून केली जात आहे ‘कॅश’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 06:00 AM2020-03-15T06:00:00+5:302020-03-15T06:00:33+5:30
तसेही ट्रॅव्हल्स कंपन्यांची तिकीट दरातील मनमानी प्रशासनाकडून नेहमीच सहन करून घेतली जाते. इतरवेळी ७०० ते १२०० रुपयांपर्यंत असणारा खासगी ट्रॅव्हल्सचा दर आज तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शाळा, महाविद्यालय यासह इतर काही संस्थांनाही सुट्या देण्याचे आदेश शासनाने दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पुण्यामध्ये वाढत चाललेली कोरोना व्हायरसची दहशत ‘कॅश’ करण्याची संधी ट्रॅव्हल्स कंपन्यांनीही सोडली नाही. नियमित दरापेक्षा तिप्पट तिकीट आकारली जात आहे. यामध्ये नागरिकांची सर्रास होणारी लूट थांबविण्यासाठी प्रशासनाकडून कुठलीही पावले उचलली जात नाही.
तसेही ट्रॅव्हल्स कंपन्यांची तिकीट दरातील मनमानी प्रशासनाकडून नेहमीच सहन करून घेतली जाते. इतरवेळी ७०० ते १२०० रुपयांपर्यंत असणारा खासगी ट्रॅव्हल्सचा दर आज तीन हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शाळा, महाविद्यालय यासह इतर काही संस्थांनाही सुट्या देण्याचे आदेश शासनाने दिले आहे. यामुळे बाहेरगावहून शिकण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणांमुळे पुणे शहरात राहात असलेले विद्यार्थी, नागरिक यांची आपल्या गावी जाण्यासाठी घाई सुरू झाली आहे. शक्य तितक्या लवकर पुण्यातून बाहेर पडण्याचा आटापिटा त्यांच्याकडून केला जात आहे. याचाच गैरफायदा ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून उचलला जात आहे. पुणे ते यवतमाळ तिकीट भाडे तीन हजार, दोन हजार ८९९, दोन हजार ७५४ इतके आकारले जात आहे. एवढ्याच प्रवासाचे यवतमाळ ते पुणे प्रवास भाडे मात्र ७०० ते एक हजार २०० रुपयेपर्यंत घेतले जात आहे. अर्थातच पुणे शहरात असलेली कोरोनाची दहशत ट्रॅव्हल्स मालकांकडून कॅश करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. विशिष्ट जागेवरील सीट देण्यासाठीही तिकिटाचे स्पेशल दर आकारले जात आहे. मात्र नाईलाज असल्याने प्रवाशांना या महागड्या दरामध्ये प्रवास करावा लागत आहे. याशिवाय ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने कुठल्याही प्रभावी उपाययोजना करण्यात आलेल्या नाही. केवळ सीट भरणे असा एक कलमी कार्यक्रम राबविला जात आहे. गर्दीच्या ठिकाणी घोळका करून थांबू नये, अशा सूचना प्रशासनाच्या आहे. ट्रॅव्हल्समध्ये मात्र खचाखच भरून वाहतूक होत आहे.
आरटीओच्या नियमांना तिलांजली
एसटी बस भाड्यापेक्षा केवळ दहा टक्के अधिक भाडे ट्रॅव्हल्स कंपन्यांना घेता येईल, असा आरटीओचा नियम आहे. मात्र याठिकाणी या नियमाला तिलांजली देण्यात आली आहे. दरम्यान, गरज भासल्यास पुणेकरिता बसफेऱ्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे एसटीचे यवतमाळ विभागीय नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.