लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत आहे. शनिवारी आणखी १२१ बाधित रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ५६३ झाली आहे. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांत जिल्ह्यातील रुग्णसंख्येत ७१७ ची भर पडल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची गरज आहे. सध्या ॲक्टिव्ह असलेल्यांपैकी ५९ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्हा कोरेानामुक्तीच्या वाटेवर असतानाच रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. १ ते १५ जानेवारी या कालावधीत ७१७ बाधित रुग्ण आढळून आले. कोरोनाच्या या लाटेत रुग्णाला गंभीर स्वरूपाचा आजार होत नसल्याचे सांगितले जात असले तरी रुग्णांची संख्या अशीच वाढत गेल्यास त्या प्रमाणात गंभीर रुग्णांची संख्याही वाढणार असल्याने येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणेवर पुन्हा ताण येण्याची भीती वर्तविली जात आहे. शनिवारी कोरोना तपासणीचे १५८३ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १२१ पॉझिटिव्ह, तर १४६२ अहवाल निगेटिव्ह आले. या नव्या रुग्णामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ५६३ झाली आहे. यातील ५३३ जण जिल्ह्यातील, तर ३० जण जिल्ह्याबाहेरील आहेत. एकूण रुग्णांपैकी ५०४ जण गृहविलगीकरणात असून, ५९ जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ७३ हजार ६९८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यातील ७१ हजार ३४७ जणांनी कोरोनावर मात केली असून, १७८८ जणांचा या आजारामुळे मृत्यू झाला आहे. केवळ १५ दिवसात कोरोनाचे सक्रिय रुग्ण पाचशेच्या पलीकडे पोहोचल्याने तिसऱ्या लाटेचा धोका स्पष्ट झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याची गरज आहे.
यवतमाळमध्ये निघाले सर्वाधिक ५२ रुग्ण - सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण यवतमाळ तालुक्यात आढळत आहेत. शनिवारी पॉझिटिव्ह आलेल्या १२१ पैकी तब्बल ५२ रुग्ण हे यवतमाळ येथील आहेत. आर्णी तालुक्यातील आठ, दारव्हा पाच, दिग्रस चार, कळंब तीन, नेर १०, पुसद नऊ, राळेगाव १२, वणी सहा, झरी जामणी दोन, तर पांढरकवडा तालुक्यात एक बाधित रुग्ण आढळून आला असून, इतर नऊ रुग्ण हे जिल्ह्याबाहेरील आहेत. बाधित आलेल्या १२१ पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ३८ महिला व ८३ पुरुष रुग्णांचा समावेश आहे.
कोरोनाला हलक्यात घेऊ नका - कोरोनाची वाढती रुग्णसंख्या जिल्हावासीयांची चिंता वाढविणारी आहे. अवघ्या १५ दिवसांत जिल्ह्यात ७१७ बाधित रुग्ण आढळले आहेत. १ जानेवारी रोजी जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर ०.३५ होता. तो आता शनिवार १५ जानेवारी रोजी ७.६४ वर गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाला हलक्यात न घेता सतर्कता बाळगायला हवी. फिजिकल डिस्टन्सींग ठेवण्याबरोबरच घराबाहेर पडताना मास्क वापरायला हवा. दरम्यान जिल्ह्यात सद्य:स्थितीत कोरोना रुग्णांसाठी १७०६ बेडची उपलब्धता असल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.