संमती ६२ हजार पालकांची, शाळेत केवळ १५ हजार विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 05:00 AM2020-11-27T05:00:00+5:302020-11-27T05:00:26+5:30
राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरविणे सुरू केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून अशी पत्रे गोळा केली. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या वर्गात १ लाख ४९ हजार ७८५ विद्यार्थी आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : लाॅकडाऊननंतर जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा सुरू करताना ६२ हजार ९०९ पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत संमतीपत्र दिले. प्रत्यक्षात केवळ १५ हजार ४२१ विद्यार्थीच शाळेत येत आहेत. यावरून पालकांच्या मनात अजूनही धाकधुक असल्याचे स्पष्ट होते.
राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे प्रत्यक्ष वर्ग भरविणे सुरू केले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून संमतीपत्र घेणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांच्या माध्यमातून अशी पत्रे गोळा केली. जिल्ह्यात नववी ते बारावीच्या वर्गात १ लाख ४९ हजार ७८५ विद्यार्थी आहेत. त्यापैकी ४२ टक्के म्हणजे ६२ हजार ९०९ विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीपत्र भरून दिले. परंतु, प्रत्यक्षात केवळ दहा टक्के म्हणजे १५ हजारच पालकांनी मुलांना शाळेत पाठविले आहे. उर्वरित ९० टक्के पालकांच्या मनात संभ्रम अद्याप कायम असल्याचे यावरून स्पष्ट होते.
दरम्यान, शाळांमध्ये सोशल डिस्टन्स, सॅनिटायझर, थर्मल गन आदी गोष्टींचा काटेकोर वापर होत आहे. शाळाही केवळ चार तासच भरविली जात आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना शाळेत पाठविले पाहिजे असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु, प्रत्यक्षात जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. तर शासनानेही कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका वर्तविला आहे. त्यामुळे बहुतांश पालक मुलांना सध्याच शाळेत पाठविण्याबाबत ठाम भूमिका घेताना दिसत नाही. तर अनेक विद्यार्थी मात्र शिक्षणाच्या ओढीने स्वत:च जमेल त्या मार्गाने शाळा गाठताना दिसत आहे. त्यांना शिक्षक वर्गाकडूनही पालकांप्रमाणे सांभाळून घेतले जात आहे.
शाळांतील उपस्थिती
सोमवारी १५ हजार ४२१ विद्यार्थी शाळेत आले. मात्र दुसऱ्या दिवशीपासून या उपस्थितीमध्ये वाढ होत असल्याचे शिक्षण विभागातून सांगण्यात आले. सध्या कोणत्या तालुक्यात किती विद्यार्थी शाळेत उपस्थित होत आहेत, याची आकडेवारी गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत गोळा केली जात आहे. त्याचा एकत्रित अहवाल दोन दिवसानंतर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले.
स्वॅब टेस्टमुळे शिक्षकांची संख्या कमी
जिल्ह्यात एकंदर ३३९७ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्याचे निर्धारित होते. प्रत्यक्षात त्यापेक्षाही अधिक शिक्षकांनी चाचणी करून घेतली. त्यातील ८१ शिक्षक व ८ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आले. त्यामुळे कर्मचारी सध्या शाळेत अनुपस्थित आहेत. तर काही शिक्षकांची चाचणी होऊनही त्यांचे अहवाल येणे बाकी असल्यामुळे तेही शाळेत गैरहजर आहेत. मात्र उर्वरित सर्व शिक्षक अध्यापनासाठी मेहनत घेत आहे.
४२ टक्के पालकांचे संमतीपत्र आले आहे. विद्यार्थी उपस्थिती हळूहळू वाढेल. ज्यांची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली, तेवढे शिक्षक वगळता सर्वच शिक्षक शाळेत अध्यापन करीत आहेत. - दीपक चवणे,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यवतमाळ