छत्रपतींनी धार्मिक, मानसिक गुलामगिरी संपविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 06:00 AM2020-02-21T06:00:00+5:302020-02-21T06:01:00+5:30
मराठा सेवा संघ वणी शाखेच्यावतीने बुधवारी छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवचरित्र म्हणजे फक्त लढाया आणि ढाल-तलवार यांचा इतिहास नव्हे, तर शिवचरित्र हे विविध अंगांने अभ्यासायला हवे. शिवचरित्र म्हणजे जगातील पहिल्या लोकशाही राज्याचा इतिहास आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : धार्मिक आणि मानसिक गुलामगिरी संपविण्याचे श्रेय शिवाजी महाराजांकडे जाते, असे प्रतिपादन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ते प्रा.डॉ.शिवानंद भानुसे यांनी येथे केले.
मराठा सेवा संघ वणी शाखेच्यावतीने बुधवारी छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शिवचरित्र म्हणजे फक्त लढाया आणि ढाल-तलवार यांचा इतिहास नव्हे, तर शिवचरित्र हे विविध अंगांने अभ्यासायला हवे. शिवचरित्र म्हणजे जगातील पहिल्या लोकशाही राज्याचा इतिहास आहे. तसेच शिवचरित्र हे मानवतेच्या संघर्षाचा, वर्ण व्यवस्थेविरूद्धच्या लढाईचा आणि सरंजामीशाही विरूद्ध म्हणजे आजच्या भांडवलशाहीविरूद्ध केलेल्या संघषार्चा इतिहास असल्याचे भानुसे म्हणाले. एक राजा, एक पिता, एक पूत्र, एक पती या नात्याने छत्रपतींचे चरित्र हे जगात आदर्शवत ठरल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाचे कोषाध्यक्ष अशोक चौधरी, उद्घाटक पद्मशाली समाज संघटनेचे अध्यक्ष रमेश सुंकुरवार, तर स्वागताध्यक्ष सुशगंगा ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटचे संचालक प्रदीप बोनगीरवार होते. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मंगेश खामनकर, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजय धोबे, जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्ष भारती राजपूत, धनोजे कुणबी समाज अध्यक्ष अनंत एकरे, लोहार समाज अध्यक्ष संजय गाताडे, सुतार समाज अध्यक्ष अमन बुरडकर, बंजारा समाज अध्यक्ष डॉ.विजय राठोड, गवळी समाज अध्यक्ष सुभाष वाघळकर, गुरव समाज अध्यक्ष नरेंद्र घुले, माळी समाज प्रतिनिधी भास्कर वाढई, शिंपी समाजाचे अध्यक्ष मोरेश्वर ऊज्वलकर, भावसार समाज सचिव संजय दखने, गुरव समाज अध्यक्ष नरेंद्र किटकुले, तेली समाज अध्यक्ष किशोर ओचावार, तेली समाज संघटनेचे संजय पोटदुखे प्रामुख्याने उपस्थित होते.