शिक्षण ऑनलाईन; मुलं ऑफलाईन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 05:00 AM2020-06-29T05:00:00+5:302020-06-29T05:00:18+5:30
काही खासगी शाळांचे कामकाज १५ तर शासकीय शाळांतील कामकाज २६ जूनपासून सुरू करण्यात आले. पालकांचे ग्रुप करून त्याद्वारे गृहपाठ देण्याचेच काम जिल्ह्यातील अनेक शाळांनी केले. विविध ठिकाणांहून अभ्यासाच्या लिंक या ग्रुपवर टाकून विद्यार्थ्यांना स्वंयअध्ययनाने अभ्यास पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बहुतांश शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापनाची पद्धत सुरू करण्यात आली आहे. पण यावर कसं शिकवलं जावं, हे अद्याप शिक्षकांना न समजल्याने गोंधळाची स्थिती आहे. कित्येक शाळांनी ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या नावाने निव्वळ लिंक फॉरवर्ड करून स्वयंअध्ययन करण्याचा पर्याय विद्यार्थ्यांपुढे खुला केला आहे. परिणामी, शिक्षकांच्या ऑनलाईन शाळेत मुलं मात्र ऑफलाईन झाली आहेत.
काही खासगी शाळांचे कामकाज १५ तर शासकीय शाळांतील कामकाज २६ जूनपासून सुरू करण्यात आले. पालकांचे ग्रुप करून त्याद्वारे गृहपाठ देण्याचेच काम जिल्ह्यातील अनेक शाळांनी केले. विविध ठिकाणांहून अभ्यासाच्या लिंक या ग्रुपवर टाकून विद्यार्थ्यांना स्वंयअध्ययनाने अभ्यास पूर्ण करण्याचे टार्गेट देण्यात आले. आपण काय शिकतोय, का शिकतोय याची कसलीच कल्पना विद्यार्थ्यांना देण्यात येत नाही. त्यामुळे गृहपाठ वेळेत नाही पूर्ण केला तर शिक्षेच्या भीतीने विद्यार्थी पालकांकडूनच हा गृहपाठ सोडवून घेत आहेत.
ज्या मुलांचे पालक नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत, त्यांना स्वतंत्र मोबाईल देणंही धोक्याचं ठरत आहे. काही स्मार्ट पालकांनी मुलांना नोट पॅड घेऊन त्याचं नियंत्रण अॅपद्वारे स्वत:च्या मोबाईलमध्ये ठेवलं आहे. काही पालकांनी ऑनलाईनबाबत शाळा व्यवस्थापनाकडे नाराजीही व्यक्त केली.
ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थी पुरते गोंधळले आहेत. बाहेर कोरोनाची भीती आणि वर्ग सुरू झाल्यापासून आपल्याला त्यातील काहीच समजत नाही, ही भावना त्यांना सर्वाधिक त्रासदायक ठरत आहे.
निव्वळ लिंक पाठवून शिक्षण मिळणार कसं?
शाळेने सुरू केलेल्या पालकांच्या ग्रुपवर रोज सकाळी विशिष्ट विषयांचे शिक्षक त्यांचा गृहपाठ रोजच्या रोज टाकतात. हा गृहपाठ कसा करायचा, हे समजून देण्यासाठीही विद्यार्थ्यांना लिंक दिली जाते. विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्यात काय समस्या येताहेत, हे जाणून घेण्याची तसदी शिक्षक घेत नाहीत. एखादा मुद्दा विद्यार्थ्यांना नाही समजला तर तो कोणाला, कुठं आणि कसा विचारायचं हे कोणालाच माहिती नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचा गृहपाठ पालकांची जबाबदारी झाली. वर्गातील अनेकांकडून गृहपाठ पूर्ण केला जात नाही. याविषयी कोणत्याही शिक्षकाकडून संबंधित विद्यार्थी किंवा त्याच्या पालकाकडे कसलीच चौकशी होत नाही.
शिक्षकांची शिकवणी
ऑनलाईन अभ्यासक्रम शिकविण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यवस्थेत कोणालाच वाटली नाही. अनेक ठिकाणी नेटवर्कची समस्या असल्याने विद्यार्थ्यांना लिंक देऊन स्वयंअध्ययनाचा मार्ग शिक्षकांनी चोखाळला आहे.