रेल्वेचा भुयारी मार्ग देतो अपघातास निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:28+5:30
शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचे काम करताना देवळी तालुक्यातील हुसनापूर या गावाजवळ सात गावातील नागरिकांकरिता ये-जा करण्याकरिता एक भुयारी मार्ग करण्यात आला. हुसनापूर हे राष्ट्रीय मार्गावर असून या गावातून वाबगाव, गणेशपूर, सैदापूर, खर्डा, बोपापूर, ममिनपूर या गावावरून पुढे अंदोरी व यवतमाळ जिल्हा राळेगाव येथे जाण्याचा मार्ग आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भिडी : वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे काम काही भागापर्यंत पूर्ण झाले. या मार्गावरील काही गावाच्या संपर्काकरिता भुयारी मार्गाची निर्मिती केली. मात्र, काही ठिकाणी चुकीच्या ठिकाणी भुयारी मार्ग केल्याने पावसाळ्यात येथून जाताना नागरिकांना मरणयातना सोसाव्या लागत आहेत.
शेतकरी, शेतमजूर आणि नागरिकांची मोठी वर्दळ लक्षात घेऊन वर्धा-नांदेड या रेल्वे मार्गाचे काम करताना देवळी तालुक्यातील हुसनापूर या गावाजवळ सात गावातील नागरिकांकरिता ये-जा करण्याकरिता एक भुयारी मार्ग करण्यात आला. हुसनापूर हे राष्ट्रीय मार्गावर असून या गावातून वाबगाव, गणेशपूर, सैदापूर, खर्डा, बोपापूर, ममिनपूर या गावावरून पुढे अंदोरी व यवतमाळ जिल्हा राळेगाव येथे जाण्याचा मार्ग आहे. याच मार्गाने या भागातील नागरिक भिडी येथे ये-जा करीत असतात. मात्र, हुसनापूरजवळील भुयारी मार्गावरील पुलाची उंचीसुद्धा कमी असून या पुलाचे बांधकाम जमिनीच्या समांतर केल्याने डांबरी रस्ता उंच झाल्याने पावसाचे पाणी साचून राहते. मोठ्या प्रमाणावर गाळ असतो.
गाळामुळे ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघातास सामोर जावे लागत. तर या मार्गावरून शेतकऱ्यांना शेतात खत बियाणे कसे न्यावे, असाही प्रश्न पडला आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी अधिकाऱ्यांना कळवूनसुध्दा ते काम आमचे नाही, ते कंत्राटदारांचे आहे, असे सांगून जबाबदारी झटकत आहेत. याकडे रेल्वेच्या संबंधितअधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या मार्गावर साचलेले पाणी व गाळ साफ करून मार्ग रहदारीकरिता मोकळा करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.