राज्य महामार्ग ठरतोय कर्दनकाळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 06:00 AM2019-09-08T06:00:00+5:302019-09-08T06:00:15+5:30
वर्धा-सालोड (हिरापूर) मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर जड वाहने या मार्गावरून सुसाट धावतात. अशातच महामार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांनी या मार्गावर जाळेच विणल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : वर्धा-सालोड (हिरापूर) राज्य महामार्गाची ठिकठिकाणी डांबर उखडून दैना झालेली आहे. वाहनचालकांना या मार्गावरून जीवघेणा प्रवास करावा लागत असताना शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे.
वर्धा-सालोड (हिरापूर) मार्ग अत्यंत वर्दळीचा आणि दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. दिवसाला हजारावर जड वाहने या मार्गावरून सुसाट धावतात. अशातच महामार्गावरील डांबर उखडून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहे. खड्ड्यांनी या मार्गावर जाळेच विणल्याचे दिसून येते. दुचाकीचालकांना येथून मार्गक्रमण करताना तारेवरचीच कसरत करावी लागते. हजारावर खड्डे असल्याने संपूर्ण महामार्गच खड्ड्यात गेल्याचे येथून मार्गक्रमण करताना दिसून येते. सालोड, चिकणी (जामणी) व परिसरातील शेतकऱ्यांना शेतमाल याच मार्गावरून आणावा लागतो.
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकवार शेतमाल भरून असलेले वाहन या दुर्दशित रस्त्यामुळे नादुरुस्त होते. महामंडळाच्या बसेस या मार्गावर नेहमीच नादुरुस्त होताना दिसतात. एकंदरीत मार्गाच्या दुर्दशेमुळे सर्वांनाचा फटका बसत आहे. मार्गाच्या कडाही खचलेल्या असून विरुद्ध दिशेने एकाचवेळी दोन वाहने आल्यास लहान वाहनांना अपघात होतो. नागपूर, वर्ध्यावरून यवतमाळ येथे जाण्यास हा मार्ग सोयीचा आहे. आठवड्यापूर्वी झालेल्या अपघातात दोन युवक जखमी झाले. यापूर्वीही कित्येकांना अपंगत्व आले आहे. सर्वत्र मार्गांचे सिमेंटीकरण केले जात असताना या महामार्गाच्या नूतनीकरणाकडे शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून संभाव्य धोका लक्षात घेऊन या महामार्गाचे नव्याने बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी सालोड (हिरापूर) व परिसरातील गावांतील नागरिकांनी केली आहे.
पाच किलोमीटर महामार्ग खड्ड्यात
वर्धा-सालोड (हिरापूर) अंतर पाच ते सहा किलोमीटर आहे. या संपूर्ण महामार्गाची मागील कित्येक दिवसांपासून दुर्दशा झाली आहे. मार्गावर हजारावर खड्डे आहेत. रात्री वाहनचालकांना हे खड्डे दृष्टीस पडत नसल्याने वाहने उसळून अपघात होतात. चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या सुट्या भागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे पाठ
तुळजापूर-बुट्टीबोरी मार्गाचे काम पूर्णत्वास जात आहे. शहरातही विविध रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. मात्र, जुन्या रस्त्यांच्या दुरुस्तीसह नूतनीकरणाकडे शासनाचे दुर्लक्ष का होत आहे, हे न उलगडणारे कोडे आहे.